नागपूर : शहराचे तापमान ४३ पार पोहोचले आहे. सूर्य जणू आग ओकत आहे. उन्हाच्या तडाख्याने तब्येतीच्या तक्रारी वाढल्या आहेत. रुग्णालयांमध्येही मोठी गर्दी होत आहे. तरीही शहरात अद्याप उष्माघाताच्या एकही रुग्णाची अधिकृत नोंद झालेली नाही. त्यामुळे नागपूरकरांची उन्हाची दाहकता सहन करण्याची शक्ती वाढली आहे की महापालिकेच्या बचावात्मक धोरणामुळे रुग्ण सापडत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

उन्हात गेल्यावर प्रकृती बिघडलेल्यांची नोंद उष्माघातात होणे अपेक्षित आहे. परंतु उष्माघाताच्या रुग्णांबाबत डॉक्टरांना बऱ्याच नोंदी व कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. त्यामुळे उष्माघाताची अधिकृत नोंद करण्याऐवजी लक्षणे बघून उपचार केले जात असल्याची माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली.

हेही वाचा – “मला कोणाची रसद घेण्याची गरज नाही”, ठाकरेंचा राऊत यांना टोला

शहरात अद्याप एकही उष्माघाताचा रुग्ण महापालिकेने नोंदवला नाही. परंतु, याआधी महापालिकेच्या आरोग्य विभागाने दगावलेल्या तिघांची उष्माघात संशयित म्हणून नोंद केली आहे. परंतु अद्यापही मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांकडून दगावलेल्यांचा शवविच्छेदन अहवाल महापालिकेला मिळालेला नाही. त्यामुळे उन्हाळ्यातील उष्माघात संशयितांच्या मृत्यूचे कारण महापालिकेला पावसाळ्यात कळणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणांमुळे उष्माघाताबाबत महापालिकेचा आरोग्य विभाग, वैद्यकीय महाविद्यालय आणि पोलिसांमध्ये समन्वय नसल्याचे चित्र समोर आले आहे. महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले की, अद्याप शवविच्छेदन अहवाल मिळाला नसल्याने मृत्यू विश्लेषण समितीची बैठक झाली नाही.

विदर्भात ६९ रुग्णांची नोंद

विदर्भातील अकरा जिल्ह्यात १ मार्च २०२४ ते १४ मे २०२४ पर्यंतच्या कालावधीत उष्माघाताचे ६९ रुग्ण नोंदवले गेले. त्यापैकी सर्वाधिक २१ रुग्ण बुलढाणा जिल्ह्यातील होते. नागपूर ग्रामीणमध्ये ११, गोंदिया ६, गडचिरोली ६, चंद्रपूर २, अकोला ५, अमरावती ३, भंडारा १, वर्धा ६, वाशिम १ व यवतमाळ जिल्ह्यात ७ रुग्ण नोंदवले गेले.

नवतपाच्या पहिल्याच दिवशी तापमान घसरले

शनिवारपासून नवतपाला सुरुवात झाली. परंतु, वाढलेल्या तापमानाच्या पाऱ्यात किंचित घसरण दिसून आली. गेल्या चार-पाच दिवसांपासून विदर्भात प्रत्येक २४ तासात तापमानात प्रचंड वाढ होत होती. अकोला शहरात शुक्रवारी तापमान ४५.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. दरम्यान, शनिवारी नवतपाच्या पहिल्याच दिवशी विदर्भातील अनेक शहरांमध्ये तापमानात किंचित घसरण झाली. वैज्ञानिक तथ्यानुसार, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर कमी होते. त्या काळात सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर पडतात. त्यामुळे या दिवसांत उष्णता सर्वाधिक असते. पण, गेल्या चार दिवसांच्या तुलनेत शनिवारी तापमानात किंचित घसरण दिसून आली. तरीही अकोला शहरातील तापमान मात्र, ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिकच होते. यवतमाळात ४५.५, ब्रम्हपुरी, अमरावती, वर्धा या शहरात ४४ तर चंद्रपूर, वाशिम येथे तापमान ४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते.

हेही वाचा – अकोला : तप्त उन्हात राबताहेत वीटभट्टी कामगार, सुविधांची वानवा अन् समस्यांचा विळखा

उष्माघातामुळे होणारा त्रास

मनुष्याचे शरीराचे सर्वसाधारण तापमान ३६.४ ते ३७.२ अंश सेल्सियस असते. बाहेर अथवा घरात तापमान अचानक वाढल्यास उष्णतेशी निगडित आजार होतात. त्यात शरीरावर लाल चट्टे उठणे, हात, पाय आणि टाचांना सूज येणे, स्नायू दुखणे, चक्कर येणे आणि उष्माघात असा त्रास होतो. उष्माघातामुळे हृदयविकारासह श्वसनविकार आणि मूत्रपिंडविकाराचा धोका निर्माण होतो.