नागपूर : शहरात चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यापासून पाण्यासाठी मोर्चे काढणे बंद झाले, असा दावा भाजपाचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करीत असले तरी प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळे आहे. बुधवारी भाजपाच्या नेतृत्वात उत्तर नागपूरमधील पाणी समस्येच्या मुद्यावरून महापालिकेच्या आशीनगर झोनवर मोर्चा काढण्यात आला व निदर्शने करण्यात आली.

महापालिकेने शहरातील पाणी वितरणाचे खासगीकरण करीत एका कंपनीकडे योजनेच्या संचालनाची जबाबदारी दिली. कंपनीने चोवीस तास पाणीपुरवठा करू, असा दावा केला होता. प्रायोगिक तत्त्वावर ती एका झोनमध्ये राबवण्यातही आली. दरम्यानच्या काळात भाजपाने या योजनेचा मोठा प्रचार केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते गडकरी हे जाहीर कार्यक्रमात या योजनेचा उल्लेख करीत योजना लागू केल्यापासून नागपूरमध्ये पाण्यासाठी मोर्चे निघणे बंद झाले, असा दावा करीत होते. मात्र, त्यांचा हा दावा त्यांच्याच पक्षाकडून खोडून काढला जात आहे.

हेही वाचा – बुलढाणा : संशयित चोरट्यांना गावकऱ्यांची लाठ्याकाठ्यांनी मारहाण; सौम्य बळाचा वापर करून जमाव पांगविला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी उत्तर नागपूरमधील पाणीटंचाईच्या संदर्भात भाजपाचे उत्तर नागपूरचे उपाध्यक्ष दिनेश इलमे यांच्या नेतृत्वात आशीनगर झोन कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. लष्करीबागमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, असा दावा त्यांनी केला आहे. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शनेही केली व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी उत्तर नागपूर भाजपाचे संपर्क मंत्री संजय तरारे, उपाध्यक्ष महेश माने, मनोज कहाळकर यांच्यासह अन्य नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा नेते व माजी नगरसेवकांनीही चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबवणाऱ्या ‘ओसीडब्ल्यू’च्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली आहे. खुद्द गडकरी यांनीही अनेकदा बैठका घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश कंपनीला दिले आहे, हे येथे उल्लेखनीय.