नागपूर : केंद्र सरकारने २०१९ पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवण्याची सक्ती केली आहे. परंतु, लोकांनी ती गंभीरतेने घेतलेली दिसत नाही. आता मात्र परिवहन खात्याने १६ जूनपासून ही पाटी नसलेल्या वाहनांची ‘आरटीओ’तील कामे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे खोळंबणार आहेत.
केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. परंतु, १० टक्केही वाहनधारकांनी ही पाटी बसवलेली नाही. त्यामुळे परिवहन आयुक्त कार्यालयाने सर्व आरटीओ कार्यालयांना २ जूनला एक आदेश दिला आहे. या आदेशानुसार, १६ जून २०२५ पासून ही पाटी नसलेल्या वाहनधारकांच्या वाहनांच्या नोंदणी प्रमाणपत्रामध्ये (आरसी) पत्ता बदल करणे, वाहनावरील वित्त बोजा चढवणे वा उतरवणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, ना- हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे इत्यादी कामे थांबवली जाणार आहेत. परंतु, पाटी बसवण्यासाठी वेळ घेतल्याची पावती दाखवल्यास मात्र काम केले जाणार आहे. राज्यात ही पाटी बसवण्यासाठी ३० जून २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
आरटीओ कार्यालयातील ‘ही’ कामे नाही थांबणार
परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार, ‘एचएसआरपी’ नसलेल्या वाहनांची काही कामे थांबवली जाणार असली तरी जुन्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, परवानाविषयक काम व खासगी वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण केले जाणार आहे.
प्रकरण न्यायप्रविष्ट, दर कमी करा – जनमंच
‘एचएसआरपी’ क्रमांक पाटीचे दर इतर राज्याच्या तुलनेत अवास्तव असल्याने त्याला प्रतिसाद नाही. त्यातच याबाबतचे एक प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यावर निर्णय आला नसतानाच आता परिवहन आयुक्त कार्यालयाने पाटी नसलेल्या वाहनांची कामे थांबवण्याचा निर्णय घेणे योग्य नाही, असे मत नागपूरच्या जनमंच संघटनेचे अध्यक्ष राजीव जगताप यांनी व्यक्त केले.
सक्तीशिवाय दुसरी भाषा समजत नाही – परिवहन विभाग
परिवहन खात्याने ‘एचएसआरपी’ लावण्यासाठी आवाहन केले, मुदतवाढ दिली. त्यानंतरही राज्यातील २ कोटीपैकी केवळ २० लाख वाहन धारकांनीच या पाट्या लावल्या. लोक सक्तीशिवाय दुसरी भाषा समजत नसल्याने १६ जूननंतर या पाट्या नसलेल्या वाहनांची काही कामे थांवबली जाणार आहेत, अशी माहिती राज्याच्या परिवहन विभागाचे सहपरिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. दरम्यान मुदतीनंतर या पाट्या न लावणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.