अमरावती : मध्य रेल्वेने आषाढी एकादशी निमित्त विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीसाठी १ ते १० जुलैदरम्यान रेल्वे प्रशासनाकडून या विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत. मिरज तसेच पंढरपूरपर्यंत या गाड्या धावणार आहेत.

नागपूर-मिरज विशेष रेल्वेगाडी क्रमांक ०१२०५ नागपूर येथून ४ जुलै आणि ५ जुलै रोजी सकाळी ८.५० वाजता सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता पोहोचेल. क्रमांक ०१२०६ मिरज येथून ५ जुलै व ६ जुलै दुपारी १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी

दुपारी १२.२५ वाजता पोहोचेल. अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्दुवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठे महाकाळ, सलगरे आणि अरग असे या गाड्यांचे थांबे आहेत.

नवीन अमरावती-पंढरपूर विशेष रेल्वेगाडी क्रमांक ०१११९ नवीन अमरावती येथून २ जुलै आणि ५ जुलै रोजी दुपारी २.४० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ९.१० वाजता पोहोचेल. विशेष रेल्वेगाडी क्रमांक ०११२० पंढरपूर येथून ३ जुलै व ६ जुलै रोजी पंढरपूर येथून सायंकाळी ७.३० वाजता सुटेल आणि नवीन अमरावती येथे दुसऱ्या दिवशी १२.५० वाजता पोहोचेल. या गाड्यांचे थांबे बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डवाडी असे आहेत.

या विशेष गाड्यांना दोन तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ सेकंड सीटिंग आणि सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासह इतरही मार्गावरून पंढरपूर-मिरजसाठी विशेष गाड्या धावतील. या सर्व आषाढी विशेष गाड्यांचे आरक्षण विशेष शुल्कासह १६ जूनपासून संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच संकेतस्थळावरून सुरू, होणार असल्याचे रेल्वेच्या प्रसिद्धिपत्रकातून सांगण्यात आले. विदर्भातून मोठ्या संख्येने भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जात असतात. आषाढी एकादशीनिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने या विशेष गाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमुळे भाविकांची चांगली सोय होणार आहे.