नाशिक – शिवसेनेतून (उद्धव ठाकरे) हकालपट्टी झालेले उपनेते सुधाकर बडगुजर यांना स्थानिकांचा विरोध डावलून भाजपमध्ये प्रवेश देण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. बडगुजरांवर विविध प्रकारचे १७ गुन्हे दाखल असून कारवाई टाळण्यासाठी ते भाजपमध्ये येण्याची धडपड करीत असल्याकडे पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले होते. परंतु, राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतात. न्यायालयात आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत संबंधित व्यक्ती गुन्हेगार नसतो. याचा विचार करून कुणाचेही मूल्यमापन व्हायला हवे, असे सूचक विधान बावनकुळे यांनी केले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी येथे भाजपची संकल्प से सिद्धीतक उत्तर महाराष्ट्र विभागाची कार्यशाळा पार पडली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी बडगुजर यांच्या संभाव्य प्रवेशावर भाष्य केले. भाजपमध्ये बिनशर्त येणाऱ्यांना दरवाजे उघडे आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आमदार सीमा हिरे आणि ठाकरे गटाचे बडगुजर यांच्यात लढत झाली होती. स्थानिक पातळीवर विरोध असल्याचे मान्य आहे. काही समज-गैरसमज असतात. ते दूर होण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो. आम्हालाही पक्ष संघटन वाढवायचे आहे. बडगुजरांबाबत सध्या काही ठरले नसून गिरीश महाजन नंतर पुढील भूमिका मांडतील, असे बावनकुळे यांनी सूचित केले.

बडगुजरांवर एकूण १७ गुन्हे दाखल असून त्यामुळे त्यांच्या प्रवेशास भाजप आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला. यावर भाजप प्रदेशाध्यक्षांनी सत्ताधारी-विरोधक परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करीत असतात. गुन्हेही दाखल होतात. परंतु, न्यायालयात जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत संबंधित व्यक्ती गुन्हेगार ठरत नाही, अशा प्रकारे कोणत्याही राजकीय पक्षातील व्यक्तीचे मूल्यमापन झाले पाहिजे, असे प्रदेशाध्यक्षांनी नमूद केल्यामुळे बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, आगामी सर्व निवडणुका महायुती एकत्रितपणे लढवेल. एखाद्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. त्यामुळे तिन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होणार नसल्याचा दावा बावनकुळे यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नितेश राणे यांच्या आरोपांचे काय ?

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताबरोबर सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप मागील वर्षी भाजपचे नितेश राणे यांनी विधानसभेत केला होता. तेव्हा सरकारने एसआयटीमार्फत चौकशी करून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.