अनिकेत साठे, लोकसत्ता

कुसुमाग्रजनगरी, नाशिक :  मराठी भाषेचा विकास हा आपल्या सर्वाचाच ध्यास आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, शिक्षणातही मराठीला स्थान मिळावे, यासाठी राज्य सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संदेशात केले.

येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनास मुख्यमंत्री उपस्थित राहू शकले नाहीत. संमेलनासाठी त्यांनी दिलेल्या संदेशाचे मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी वाचन केले.

संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांची लक्षणीय उपस्थिती होती. यावरून आधीही बरेच प्रवाद झाले असले तरी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी मात्र त्याचे समर्थन केले.

पावसाने उघडीप घेतल्याने आडगावस्थित कुसुमाग्रज नगरीत संमेलनाचे अतिशय थाटामाटात उद्घाटन झाले. नाशिककरांनी उत्स्फुर्तपणे हजेरी लावत साहित्यिकांचे स्वागत केले. यामुळे संयोजकांमध्ये उत्साह संचारला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात मराठी केवळ भाषा नाही तर, संस्कृती असल्याचे नमूद केले. या भूमिकेतून मराठी मुलुख एकत्र राखण्यासाठी महाराष्ट्रपुत्रांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राणांची आहुती दिली. या हुतात्म्यांचे स्मरण करणेही आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्राने ज्ञान विज्ञानाचा वारसा जाणीवपूर्वक जतन केला आहे. मराठी साहित्य विश्वानेही मनोरंजन, विरंगुळा याच बरोबर वाचकांच्या जाणीवा प्रगल्भ करण्याची भूमिका जाणीवपूर्वक स्वीकारली आहे. समाजातील अनिष्ट परंपरांवर प्रबोधनात्मक असा घाव घालण्याचे धारिष्ठय़ दाखविले आहे. असा वैज्ञानिक वारसा जपणाऱ्या वाटचालीत संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी भूषविणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले.

ईडीपिडा टळो- स्वागताध्यक्षांकडून भाजपवर शरसंधान

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अनेक नेत्यांनी राजकीय भाष्य टाळल्याचे दाखले देत राजकीय नेत्यांच्या उपस्थितीचे समर्थन करणारे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी मात्र भाजपवर नामोल्लेख टाळून शरसंधान साधले. वर्षभर राजधानीत संघर्ष करणाऱ्या बळीराजापुढे दिल्लीकरांना नमावे लागले. आता जनताच ‘ईडीपिडा टळो आणि लोकशाही बलवान होवो,’ असे म्हणत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. संमेलनावर महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिल्याचा आक्षेप भाजपने आधीच नोंदविला आहे. साहित्य महामंडळाने यापूर्वी राजकीय नेत्यांच्या उपस्थितीवर नाराजी प्रगट केली आहे. या घटनाक्रमावर स्वागताध्यक्षांनी बोट ठेवत साहित्य महामंडळाचे कान टोचले.

भाजप सोहळय़ापासून दूर  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळय़ापासून भाजपने अंतर राखले. महापौर सकाळी ग्रंथिदडीत सहभागी झाले होते. पण, सायंकाळी त्यांच्यासह भाजपचे कुणी लोकप्रतिनिधी संमेलनस्थळी फिरकले नाही. संमेलनावर भाजपने बहिष्कार टाकल्याचे चित्र होते.