नाशिक : लवकरच शाळा-महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी सुरू होणार आहे. त्यामुळे गावी जाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी नाशिक विभागाच्या वतीने वेगवेगळ्या मार्गांवर जादा बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी दिली.

उन्हाळी सुट्टीत राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास सर्वच स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते. गर्दीने स्थानक ओसंडून वाहत असते. कमी बससेवेमुळे प्रवाश्यांची गैरसोय होते. राज्य शासनाने महिलांसाठी प्रवास दरात ५० टक्के सवलत दिली आहे. तसेच ज्येष्ठांसाठीही सवलत आणि ७५ वर्षापुढील वयोगटासाठी प्रवास मोफत ठेवल्याने महिला आणि वृध्द प्रवाश्यांची संख्या वाढली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीतही अधिक गर्दी वाढेल, अशी शक्यता असल्याने महामंडळाने जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. प्रवाश्यांच्या सोयीसाठी नाशिक विभागाच्या वतीने धुळे, नंदुरबार, संभाजी नगर, पुणे, बोरिवली या मार्गावर दर अर्ध्या तासाला बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक-कसारा मार्गावर देखील अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत.

हेही वाचा… आर्थिक अडचणीमुळे अल्पभूधारक शेतकर्‍याची आत्महत्या

हेही वाचा… नाशिक : वेगवेगळ्या ठिकाणी पाच जणांची आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिकहून कसाऱ्यापर्यंत बसने जाऊन नंतर मुंबईपर्यंतचा प्रवास लोकल रेल्वेने करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. अशा प्रवाशांसाठी उंबरमाळी रेल्वे स्थानक ते नाशिक अशी नवीन बससेवा सुरू करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त सटाणा ते कल्याण फेरी देखील प्रवाश्यांच्या मागणीनुसार सुरू करण्यात येत आहे. सातपूर अद्ययावत बस स्थानक सोमवारपासून प्रवाश्यांच्या सेवेत दाखल झाले आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे येणाऱ्या तसेच नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या सातपूर स्थानकात प्रवाशांची चढ-उतार करणार आहेत. त्यामुळे सातपूर परिसरातील नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक सिया यांनी केले आहे.