नाशिक – किशोर सूर्यवंशी मार्गावरील ओमकारनगरात रात्री टोळक्याने धुडगूस घातला. इमारतीच्या वाहनतळातील वाहनांची तोडफोड करुन टोळक्याने दोघांना मारहाण केली. यावेळी एकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेण्यात आली.
याबाबत प्रदीप काकडे (ओमकारनगर,किशोर सूर्यवंशी मार्ग) यांनी तक्रार दिली. सोनू धात्रक, प्रिन्स सहाणी, चेतन गायकवाड, प्रणव मनेरे आणि त्यांचे काही साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. यातील सोनू धात्रक हा पोलीस नोंदीतील गुन्हेगार आहे. संशयित टोळक्याने रात्री परिसरात धुडगूस घालत दहशत माजवली.
कुठलेही कारण नसताना काकडे यांच्या सोसायटीच्या वाहनतळातील वाहनांच्या काचा दगड, विटा व कोयत्याने फोडल्या. यावेळी सोसायटीतील सदस्य विजय रावळ आणि तक्रारदार काकडे यांनी विरोध केला असता संशयितांनी त्यांना लाकडी दांडक्यासह हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. या घटनेत एकाने जिवे मारण्याची धमकी देत काकडे यांच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून पलायन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेगवेगळ्या भागात तिघांची आत्महत्या
शहरात वेगवेगळ्या भागात वास्तव्यास असणाऱ्या तिघांनी आत्महत्या केली. यातील २१ वर्षीय युवतीने विषारी औषध सेवन करून तर दोघांनी गळफास घेतला. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. पहिली घटना तपोवनातील थोरात मळा भागात घडली. भाग्यश्री थोरात (२१) या युवतीने घरी विषारी औषध सेवन केले. हे लक्षात येताच कुटुंबियांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. डॉ. रोहित कुलकर्णी यांनी दिलेल्या खबरीवरून आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
दुसरी घटना गरवारे पॉइंट भागात घडली. यशवंत मोरे (३८, गौतमनगर) यांनी घरातील छताच्या पत्र्याला साडी बांधून गळफास घेतला. भाऊ अमोल मोरे यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात नेले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तिसरी घटना चुंचाळे शिवारात घडली. हर्षल सूर्यवंशी (२५, बाबाजीनगर पार्कशेजारी, कन्हय्या नगरी) या युवकाने घरातील पंख्यास ओढणी बांधून गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यावर मित्र गौरव शिंदे यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचै वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात स्वतंत्र नोंदी करण्यात आल्या आहेत.
अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील अंदरसूल-वैजापूर दरम्यान मोटारीने दिलेल्या धडकेत ३२ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. रजाक पठाण (३२, इंदिरानगर झोपडपट्टी,, नाशिकरोड) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. पठाण ३० एप्रिल रोजी दुपारी अंदरसूल येथून वैजापूरच्या दिशेने दुचाकीवर प्रवास करीत होता. वैजापूर परिसरात भरधाव मोटारीने दुचाकीस धडक दिल्याने पठाण गंभीर जखमी झाला होता. स्थानिक ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यावर त्याला नाशिकरोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. याबाबत डॉ. नवनीत पवार यांनी दिलेल्या खबरीवरून उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.