जळगाव – राज्यात अतिवृष्टीसह पुरामुळे मोठे नुकसान झाल्यानंतरही पंचनाम्यांचा सोपस्कार आणि निकषांचा खेळ केला जात आहे. सरकारला संवेदना राहिलेल्या नाहीत, असा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये केला. त्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही सध्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असताना त्यात राजकारण करू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविताना सरकारने कोणतीही कागदपत्रे किंवा पात्रतेची तपासणी न करता थेट महिलांच्या खात्यात पैसे जमा केले होते. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना नुकसानीची मदत न देता पंचनामे, विविध अटी आणि कागदपत्रांच्या पडताळणीच्या नावाखाली विलंब केला जात आहे, याकडे आमदार खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगावमध्ये बोलताना लक्ष वेधले.
नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी करण्याच्या सूचना स्वतः मुख्यमंत्र्यांना आपल्या सरकारमधील मंत्र्यांना द्याव्या लागल्या, हे या राज्याचे दुर्दैव आहे. यातून या सरकारची शेतकऱ्यांबाबत काय आस्था आहे, हे दिसून येते. सध्याचे सरकार हे संवेदना नसलेले सरकार आहे, अशी टीका पत्रकारांशी बोलताना खडसे यांनी केली होती.
पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कर्ज भरण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये राहिलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने कर्ज माफीची घोषणा करावी, अशी मागणी देखील खडसे यांनी केली आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करत असताना ३३ टक्के नुकसानीचा निकष काढून शेतकऱ्यांना सरसकट पूर्ण क्षेत्राला तीन हेक्टरच्या मर्यादेत नुकसान भरपाई मिळवून द्यावी.
पुराच्या पाण्यात अचानक वाहून गेलेल्या शेळ्या, मेंढ्या व इतर पशुधनाचे मृतदेह आढळून येत नाही. त्यामुळे पशुपालक नुकसान भरपाईपासून वंचित राहतात. या करिता शासनाने स्थानिक पातळीवर चौकशी करून पशुपालकांना वाहुन गेलेल्या जनावरांच्या संख्येनुसार थेट नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी, असेही खडसे यांनी म्हटले होते.
या पार्श्वभूमीवर बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की एकनाथ खडसेंचे बोलणे उचित आहे. कारण ते सध्या विरोधी पक्षात आहेत. कोणाला मदत करायची नाही आणि घरी बसल्या टीका करायची एवढेच त्यांचे काम आहे. त्यांनी ते करत राहायचे. कधी कोणाच्या शेताच्या बांधावर गेले नाही. आज शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे, राजकारण करण्याची नाही. आपण काय केले ते बोला. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि यापुढेही राहील.
जळगाव जिल्ह्यासाठी नऊ कोटींची मदत येऊन पडली आहे. सरकार पीक नुकसानीचे पंचनामे करून लगेच पैसेही पाठवत आहे. आताही जवळपास १६ महसूल मंडळात नुकसान झाले असून, पंचनामे सुरू आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी नसली, तरी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश आम्ही प्रशासनाला दिले आहेत, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.