नाशिक : मुसळधार पावसामुळे शेतातील पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांकडे फारश्या पालेभाज्या शिल्लक नसल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीत पालक भाजी घेऊन आलेला शिलापूरचा युवा शेतकरी ओमकार कानडे सांगत होता. त्याच्याकडे ५० जुडीचा एक गठ्ठा असे १६ गठ्ठे म्हणजे एकूण ८०० जुड्या होत्या. बाजार समितीत पालेभाज्यांची वानवा असल्याने व्यावसायिक, किरकोळ विक्रेते त्याच्याकडे आपसूक खेचले गेले. घाऊक बाजारात त्याच्याकडील पालक ६५० रुपये गठ्ठा अर्थात १३ रुपये प्रति जुडीने विकला गेला.
दुसरीकडे, किरकोळ बाजारात पालकाची जुडी २० रुपयांना आहे. पावसाने कोथिंबीर, मेथी, शेपू ,कांदापात यांची वेगळी स्थिती नसून त्यांचे प्रति जुडीचे दर ५० ते ८० रुपयांवर गेले आहेत. मे महिन्यात जिल्ह्यात कधी नव्हे इतका पाऊस झाला. पावसाचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत निघाले. वादळी वारा, गारपिटीसह झालेल्या पावसात पिकांची मोठी हानी झाली. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार सुमारे एक हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक फटका मेथी, शेपू, कांदापात अशा पालेभाज्यांसह कोथिंबिरीलाही बसला. परिणामी, बाजारात त्यांची आवक लक्षणीय घटली असून दर गगनाला भिडले आहेत. अन्य भाजीपाल्यांची कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. एरवी किरकोळ बाजारात पालक भाजी पाच ते १० रुपयांत मिळते. सध्या तिलाही भाव आला आहे.
हिंगळवेढा येथील दीपक विंचू हे फ्लॉवर घेऊन बाजार समितीत आले होते. पावसात ज्यांचे पीक वाचले, तेच थोडेफार शेतकरी माल घेऊन येत असल्याचे त्यांनी सांगितले. फ्लॉवरच्या एका गठ्ठ्यात १० गड्डे असतात. त्यांचे सर्व गठ्ठे घाऊक बाजारात प्रति गठ्ठा २०० रुपये दराने विकले गेले. म्हणजे घाऊक बाजारात एका फ्लॉवरच्या गड्ड्याला २० रुपये दर मिळाला. हाच फ्लॉवर किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपयांना आहे. बाजार समितीत एरवी हिरवीगार कोथिंबीरची पथारी सर्वांचे लक्ष वेधते. सध्या तिची आवक जेमतेम असून लहान जुडी ३० तर, मोठी जुडी ६० रुपयांना खरेदी करावी लागत आहे. पाऊस कायम राहिल्यास कोंथिबीर बाजारातून गायब होईल. म्हणजे दर आणखी वाढतील, असे व्यापारी सांगतात.
वांगे शंभर रुपये किलो
किरकोळ बाजारात भेंडी ८० रुपये प्रतिकिलो, शेवगा १२०, वांगे १००, गवार ८० ते १००, डांगर ६०, बटाटे ३०, ढोबळी मिरची ८०, कारले, दो़डके आणि गिलके प्रत्येकी ८० ते १०० रुपये, काकडी ४० रुपये किलो, फ्लॉवर गड्डा ४० रुपये, कोबी २५, टोमॅटो ३० रुपये असे दर आहेत. आवक कमी असल्यामुळे अन्य भाजीपालाही महाग असून ग्राहक खरेदीत हात आखडता घेत आहेत.
आवकेत ४० टक्क्यांनी घट
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्यांची आवक ४० टक्क्यांनी कमी झाली आहे. दैनंदिन अहवालानुसार कोथिंबीरच्या ५९ हजार २०० जुड्यांची आवक होऊन त्यास प्रकारानुसार सरासरी साडेचार ते साडेपाच हजार रुपये दर मिळाला. मेथीच्या १४३०० तर शेपूच्या ११२०० जुड्यांची आवक झाली. त्यास अनुक्रमे १०० जुडीला ४७०० आणि शेपूला ३५०० रुपये दर मिळाले. कांदापातच्या १८ हजार ५०० जुड्यांची आवक होऊन त्यास सरासरी ८१०० रुपये दर मिळाला. पालकच्या अतिशय कमी जुड्या येत असल्याचे समितीने म्हटले आहे.