धुळे – शालेय शिक्षणात तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची करु नये, याच्या मागणीसाठी शहरात शिवसेना (उध्दव ठाकरे) आणि मनसे यांच्या वतीने वेगवेगळी आंदोलने करण्यात आली. ठाकरे गटाच्या वतीने जिल्ह्यातील तीन हजार ११६ शाळांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र दिले जाणार आहे, अशी माहिती महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी दिली.
ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात भूमिका मांडण्यात आली. जिल्ह्यातील एकूण तीन हजार 116 शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना निवेदन दिले जाणार असून इंग्रजी माध्यम शाळांनाही पत्र पाठवले जाणार आहे. राज्य शासनाने प्रथम मराठी शाळा वाचवण्याची आवश्यकता असून मातृभाषेचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगरप्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, प्रशांत भदाणे, महिला आघाडीच्या संगिता जोशी, जयश्री वानखेडे उपस्थित होते.
तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करु नये, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून धुळ्यातील महात्मा गांधी पुतळा चौकात जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे, मनसे धुळे महानगर शाखेकडून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. अनेक बालमानसोपचार तज्ज्ञांच्या मते तीन भाषा लहान वयात शिकवणे हे विद्यार्थ्यांच्या मानसिकेतवर परिणाम करणारे ठरु शकतात. तरीदेखील शासन आग्रही का, असा प्रश्न निवेदनात करण्यात आला आहे.
मनविसेच्या आंदोलनात खंडेरावाला साकडे घालण्यात आले. आंदोलनात ॲड. प्रसाद देशमुख, हर्षल परदेशी, गौरव गिते, यश शर्मा, संकेत सोनार आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धुळे महानगर शाखेच्यावतीने शहरातील महाराणा प्रताप चौकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षणात हिंदी विषय सक्तीच्या मुद्यावर राज्यातील सर्व शाळांना उद्देशून दिलेले पत्रक मुख्याध्यापक यांना देत भूमिका सांगण्यात आली आहे. राज्य शासनाच्या हिंदी भाषा लादण्याच्या छुप्या निर्णयाला तीव्र विरोध म्हणून मनसे महानगराच्यावतीने ’एक सही हिंदी सक्तीच्या विरोधात’ उपक्रम राबविण्यात आला. हिंदी सक्तीच्या विरोधात नागरिकांनी एक स्वाक्षरी करावी, असे आवाहन मनसे महानगर प्रमुख संजय सोनवणे, भूषण शेलार, भूषण वाडेकर, रविराज जोशी आदींनी केले होते.