जळगाव : अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले असून, संमेलनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी येण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे निश्चित झाले असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात साकारण्यात येत असलेल्या पूज्य साने गुरुजी साहित्यनगरीत ९७ वे मराठी साहित्य संमेलन दोन ते चार फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ग्रामविकासमंत्री महाजन यांनी अमळनेर येथे भेट देत संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संमेलनाच्या विविध ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. आतापर्यंत झाले नाही असे संमेलन करून दाखवायचे आहे, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात महिला मतदारांमध्ये २२ हजारने वाढ, पुरुष मतदारांमध्ये ४४ हजारने वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रताप महाविद्यालयात झालेल्या बैठकीत मंत्री महाजन यांनी, संमेलनात कुठलीही कमी राहता कामा नये, याची दक्षता घेऊ. सर्वजण आपल्यासोबत आहेत, कोणीही काळजी करू नये. तुम्ही सर्वजण कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीला माजी आमदार शिरीष चौधरी, मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी आदी उपस्थित होते.