नाशिक – पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नाशिक शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील जलसाठा ६५ टक्क्यांहून अधिकवर पोहोचला आणि शुक्रवारी या धरणातून विसर्ग करण्याची वेळ आली. पावसामुळे जून महिन्यात या धरणाचे दरवाजे उघडावे लागण्याची ही अपवादात्मक घटना आहे. इतक्या लवकर धरणातून विसर्ग करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सलग दोन दिवसांपासून घाटमाथा परिसरात अतिवृष्टीने नार-पारसह अनेक नद्यांना पूर आला आहे. त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे सध्या दारणा धरणातून ४७४२, गंगापूरमधून ११६०, कडवा ५३०, पालखेड ३२४०, नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून १५ हजार ७७५ क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे. धरण परिचालन सुचीनुसार जून महिन्यात धरणात किती जलसाठा ठेवायचा हे साधारणपणे निश्चित असते. उपरोक्त धरणांनी ती पातळी गाठल्याने विसर्ग करण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार मागील २४ तासात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्र्यंबकेश्वरमध्ये १०७,. गौतमी गोदावरी ११४ आणि गंगापूर धरण परिसरात ७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

यामुळे धरणात पाण्याचा येणारा प्रवाह वाढला. धरण परिचालन सूचीनुसार गंगापूर धरणात जून महिन्यात ५५ टक्के जलसाठा करता येतो. गंगापूर धरणात ३६८१ दशलक्ष घनफूट म्हणजे ६५ टक्क्यांहून अधिक जलसाठा झाल्यामुळे या हंगामात पहिल्यांदा शुक्रवारी सकाळी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. प्रारंभी ५७० क्युसेकचा विसर्ग नंतर ११६० पर्यंत वाढविण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाळ्यात पहिल्याच महिन्यात गंगापूरमधून पाणी सोडावे लागण्याची ही कित्येक वर्षातील पहिलीच वेळ आहे. २० वर्षांपूर्वी म्हणजे २००५ मध्ये २२ जूननंतर सलग काही दिवस पाऊस झाला होता. तेव्हा जूनच्या अखेरीस धरणातून विसर्ग करण्यात आला. यावेळी त्या कालावधीपूर्वीच पाणी सोडावे लागले असे या विभागाचे अधिकारी सांगतात. गुरुवारी धरणाचे दरवाजे उघडले नसताना गोदावरी दुथडी भरून वहात होती. गंगापूरमधून विसर्ग झाल्यामुळे गोदावरीच्या पातळीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.