नाशिक: साल्हेर किल्ल्याच्या पठारावर निर्जनस्थळी झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. जमिनीच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचे उघड झाले. साल्हेर किल्ल्यावर दोन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाले. मृतदेहांवरील कपडे आणि जवळील वस्तूंवरून त्यांची ओळख पटविण्यात आली. रामभाऊ वाघ (६०, रा. गोपाळखडी) आणि नरेश पवार (६३, रा. कळवण) अशी त्यांची नावे असल्याचे लक्षात समजले. दोघांवर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. घटनेबाबत जायखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीणचे नीती गणापुरे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व जायखेडा पोलिसांना सूचना दिल्या. वाघ आणि पवार हे १३ नोव्हेंबर रोजी कळवण परिसरातून सटाण्याच्या दिशेने मोटार सायकलीने गेल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखा आणि जायखेडा पोलीस पथकाने सतत दोन दिवस साल्हेर किल्ला, केळझर धरण परिसरात पाळत ठेवून संशयितांना ताब्यात घेतले.

हेही वाचा : नाशिक जिल्ह्यात केवळ १६ उमेदवारांना अनामत वाचविणे शक्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विश्वास देशमुख (३६, रा. केळझर), तानाजी पवार (३६, रा. खालप), शरद उर्फ बारकु गांगुर्डे (३०, रा. बागड), सोमनाथ वाघ (५०, रा. गोपाळखडी), गोपीनाथ वाघ (२८, रा. गोपाळखडी), अशोक भोये (३५, रा. सावराडा) ही संशयितांची नावे आहेत. संशयित सोमनाथ वाघ आणि रामभाऊ वाघ यांच्यात जमिनीच्या मालकीवरून वाद होते. या वादात रामभाऊ यास त्याचा मित्र नरेश पवार हा कळवण न्यायालयात मदत करत होता. या रागातून संशयित सोमनाथने रामभाऊ आणि नरेश यांना मारण्याचा बेत रचला. दोघांनाही त्याने साल्हेर किल्ल्यावर धनाचा साठा असल्याचे सांगत किल्ल्यावर बोलावून इतरांच्या सहाय्याने दोघांवर काठी, कुऱ्हाडीने वार करुन तसेच दगडाने हत्या केली. मृतदेह निर्जनस्थळी साल्हेर पठारावर सोडून मयतांच्या दुचाकीची विल्हेवाट लावली. परंतु, अखेर संशयित पोलिसांच्या तावडीत सापडले.