नाशिक:  महानगरपालिका अंतर्गत पावसाळय़ापूर्वी करण्यात आलेल्या कामांमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी आ. देवयानी फरांदे यांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांच्याकडे केली. याबाबत फरांदे यांनी आयुक्तांना निवेदन दिले. महानगरपालिका क्षेत्रात पावसाळय़ापूर्वी नालेसफाई, वाढलेल्या वृक्षांच्या फांद्या तोडणे, अपूर्ण रस्त्यांची कामे पूर्ण करणे इत्यादी पावसाळय़ापूर्वीची कामे  ही सहा जूनपर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु, नाशिक  महानगरपालिकेने पावसाळय़ापूर्वीची कामे करण्यात मोठय़ा प्रमाणावर अनियमितता ठेवली. त्याचा परिणाम म्हणून बुधवारी नाशिक शहरात पहिल्याच पावसात अनेक रस्त्यांवर पाणी तुंबले.

गोरगरीब नागरिकांच्या घरात पाणी जाऊन नुकसान झाले. अनेक व्यावसायिकांच्या दुकानात पाणी जाऊन नुकसान झाले. नागरिकांच्या झालेल्या नुकसानीला वेळेवर पावसाळय़ापूर्वीची कामे पूर्ण न करणे हीच बाब जबाबदार असल्याचा आरोप आमदार फरांदे यांनी केला आहे. अनेक रस्त्यांची कामे ही सहा जूननंतर देखील पूर्ण करण्यात आली नाही.  त्यामुळे आज शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी दिसून येते. अपघातांचे प्रमाण देखील रस्त्यावर खड्डे असल्यामुळे वाढले. या अपघातांना, वाहतूक कोंडीला वेळेवर रस्त्याची कामे पूर्ण न करणारे ठेकेदार, अधिकारी जबाबदार असल्याचा ठपका फरांदे यांनी ठेवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक महानगरपालिका अंतर्गत पावसाळय़ापूर्वी करण्यात आलेल्या  कामांच्या अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी आमदार फरांदे यांनी केली. शहरातील पावसाळय़ापूर्वीची जी कामे अद्यापही पूर्ण करण्यात आलेली नाही. ती कामे पूर्ण करण्याची मागणी फरांदे यांनी करतानाच पावसाळय़ापूर्वीच्या कामात  अनियमितता करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुध्द कारवाई करण्याची मागणी केली आहे.