नाशिक – शहर आणि ग्रामीण भागात हत्या, दरोडे, जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी, प्राणघातक हल्ले असे गुन्हे वाढत असून जोडीला अवैध धंदे फोफावले आहेत. युवावर्ग अमली पदार्थांच्या आहारी जाऊन गुन्हेगारीच्या वाटेवर जात असून वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, अवैध धंद्यांना पायबंद घालण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.
शहरासह ग्रामीण भागातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेकडे मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, ॲड. रतनकुमार इचम आदींनी पत्रकार परिषदेतून लक्ष वेधले. पाच महिन्यात नाशिक शहरात २५ हत्या झाल्या. प्राणघातक हल्ले, खंडणी वसुली, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड अशा अनेक गुन्ह्यांचा आलेख उंचावत आहे.
अमली पदार्थांचे जाळे शाळा, महाविद्यालय, पर्यटनस्थळ आणि नाईट क्लबपर्यत विस्तारले आहे. बंदी असूनही गुटखा, सुगंधित तंबाखू आदींची खुलेआम विक्री होते, असे सरचिटणीस पाटील यांच्यासह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. या संदर्भात त्यांनी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. हे प्रकार रोखण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्याची गरज आहे.
प्रत्येक विभागात गस्तीच्या कालावधीत वाढ करावी. मटका, सट्टा, अमली पदार्थ, अनधिकृत गुटखा विक्री रोखण्यासाठी कठोर मोहीम हाती घ्याव्यात. शाळा आणि महाविद्यालयात अमली पदार्थ प्रतिबंधासाठी मोहीम व समूपदेशन कार्यक्रम राबविण्याची गरज मांडण्यात आली. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकांची संख्या वाढवून सार्वजनिक ठिकाणी त्यांची उपस्थिती नियमित करावी.
सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून त्यांना नियंत्रित करण्यासाठी सायबर कक्ष सक्रिय करावा, अशी मागणी मनसेने केली आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी तातडीने कार्यवाही न झाल्यास मनसेतर्फे मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.