नाशिक – हरसूल परिसरातील वीरनगर येथील ४० वर्षाच्या विवाहिता हत्येप्रकरणी युवकाला हरसूल पोलिसांनी अवघ्या २४ तासात जेरबंद केले.
वीरनगर येथील वैशाली चव्हाण या २६ जून रोजी सायंकाळी जखमी अवस्थेत शेतात आढळल्या होत्या. पावसामुळे हा प्रकार उशीरा नातेवाईकांच्या लक्षात आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांनी गुन्ह्याची उकल होण्यासाठी काही सूचना केल्या. मृत वैशालीच्या पतीने एक व्यक्ती वैशाली हिला सायंकाळी भेटण्यासाठी आला होता, अशी माहिती पोलिसांना दिली. त्यांनी संबंधित व्यक्तीचे वर्णन केले. त्याआधारावर हरसूल पोलिसांना भगवान शिंदे (३४,रा.मोखाडा) हा त्या दिवशी वैशाली यांना शेवटचा भेटला होता, अशी माहिती मिळाली.
संशयित आडगाव शिवारात लपल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्याला सापळा रचत ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता वैशालीने प्रेमसंबंधास नकार देत शिवीगाळ आणि मारहाण केल्याने लाकडी दांडा तिच्या डोक्यात मारल्याची कबुली त्याने दिली. हरसूल पोलिसांनी त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.