नाशिक – थंड हवेसाठी ओळखले जाणारे नाशिक उन्हाळ्यात दिवसेंदिवस तप्त होऊ लागले असून बुधवारी ४२ अंशावर पारा गेला. पाच वर्षातील ही उच्चांकी पातळी आहे. उष्णतेच्या लाटेने नाशिककर अक्षरश: भाजून निघत आहेत. दिवसा उन्हाचे चटके आणि प्रचंड उकाड्याला तोंड द्यावे लागत आहे. रात्रीही वेगळी स्थिती नसते. वाढत्या तापमानाचा जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे. उष्णतेची लाट काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे.

मार्चपासून उंचावणाऱ्या तापमानाने मेच्या उत्तरार्धात ही पातळी गाठली. एप्रिल महिन्यात तापमानाने ४० अंशाचा टप्पा गाठला होता. काही दिवसांपूर्वी वळीवचा पाऊस झाल्यानंतर तापमान काहिसे कमी झाल्याचे जाणवत होते. परंतु, आकाश निरभ्र झाले आणि पारा पुन्हा उंचावू लागला. वळिवानंतर तापमानातील हे बदल तापदायक ठरले. मंगळवारी हंगामातील सर्वोच्च ४१.८ या तापमानाची नोंद झाली होती. बुधवारी त्यात आणखी वाढ होऊन ते ४२ अंश या नव्या उच्चांकावर पोहोचले. पाच वर्षानंतर तापमानाने ही पातळी गाठली. २८ एप्रिल २०१९ रोजी नाशिकचे तापमान ४२.८ अंश या पातळीवर पोहोचले होते, याकडे हवामानशास्त्र विभागाने लक्ष वेधले.

हेही वाचा >>> हाजीअली चौकातील धर्तीवर उपायांची गरज, द्वारका चौकातील वाहतूक कोंडीवर छगन भुजबळ यांची सूचना

शहर परिसरात दोन-तीन दिवसांपासून उष्णतेची लाट आहे. रणरणत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असून नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासून उन्हाचे चटके जाणवत असून सायंकाळी उशिरापर्यंत झळा लागत आहेत. रात्री देखील घामाच्या धारा निघत आहेत. अनेक भागात दुपारी अघोषित संचारबंदीसारखी स्थिती दिसून येते. वातावरणात प्रचंड उकाडा असल्याने दुपारी घराबाहेर पडणे मुश्किल होते. पंखे, कुलरचा दिवसरात्र वापर करूनही जीव कासावीस होतो. त्यातच वीज पुरवठा खंडित झाल्यास घरात बसणे नकोसे होते. उन्हामुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांना शेती कामाच्या वेळेत बदल करावा लागला आहे. थंड पाणी, आईस्क्रिम, रसवंती, शीतपेयांची दुकाने, लिंबू पाणी, बर्फाचा गोळा अशा पदार्थांना चांगलीच मागणी वाढली आहे. उन्हापासून संरक्षणासाठी टोप्या, उपरणे, बागायती रुमाल, गॉगलचा वापर वाढला आहे. अगदीच महत्वाचे काम असेल तरच नाशिककर घराबाहेर पडत आहेत. वाढते तापमान आरोग्यावर परिणाम करीत असून अशक्तपणा, थकवा, शरीर तापणे, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ आदी त्रास अनेकांना जाणवत आहे.

हेही वाचा >>> नाशिक : मुंढेगावातील विहिरीत मायलेकीचे मृतदेह

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहा वर्षातील दुसरी वेळ २०१४ ते २०२४ या १० वर्षातील उन्हाळ्याचा विचार करता तापमानाने आजवर दोनवेळा ४२ अंशाचा टप्पा गाठला आहे. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार २८ एप्रिल २०१९ रोजी नाशिकचा पारा ४२.८ अंशावर गेला होता. त्यानंतर २२ मे २०२४ रोजी तापमानाने ४२ अंशाची पातळी गाठली. २०१४ या वर्षाच्या हंगामात एक आणि सात मे या दोन दिवशी ४० अंश या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली होती. त्यापुढील २०१५ वर्षात २० एप्रिलला (४०.६ अंश), २०१६ मध्ये १९ एप्रिल व १८ मे (४१ अंश), २०१७ वर्षात १२ मे रोजी (४१.२ अंश), २०१८ वर्षात १० मे (४१.१ अंश), २०१९ मध्ये २८ एप्रिल (४२.८ अंश), २०२० वर्षात १५ एप्रिल ( ४०.५ अंश), २०२१ मध्ये २७ एप्रिल (३९.८ अंश), २०२२ मध्ये २८ एप्रिल (४१.१ अंश) आणि २०२३ मध्ये १२ मे रोजी तापमानाने ४०.७ या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद केली होती. त्यानंतर २२ मे २०२४ रोजी तापमान ४२ अंशावर पोहोचले आहे.