नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, गोदावरी नदीतील प्रदूषण हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. गोदावरी नदी प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक संस्थांपाठोपाठ आता राजकीय पक्षही रिंगणात उतरत आहेत. शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरद पवार) वतीने याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक शहरातून गोदावरीसह नंदिनी, वालदेवी आणि वाघाडी नदी वाहते. या नद्यांना काही नैसर्गिक नाले मिळतात. परंतु, या नाल्यांना निवासी आणि औद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याचे व रसायनयुक्त पाण्याच्या गटारी येऊन मिळतात. हे नाले पुढे गोदावरी नदीला जाऊन मिळतात, परिणामी, गोदावरी नदीचे पाणी दूषित होत आहे. नाशिक शहरातून येणाऱ्या सांडपाण्यामुळे गोदावरीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गोदावरीचे पाणी दूषित होत असल्याने त्याचे गंभीर परिणाम होत आहेत.
नाशिक शहरातील सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने नदीचे पाणी दूषित होत आहे. दूषित पाण्यामुळे नदीतील मासे आणि इतर जीवसृष्टी नष्ट होत आहे. दूषित पाणी पिण्यामुळे लोकांना विविध आजार होण्याची शक्यता आहे. नदीचे प्रदूषण पर्यावरणावर गंभीर परिणाम करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीला खूप महत्व आहे. येणारे पर्यटक, भाविक तसेच यात्रेकरु गोदावरी नदीचे पाणी तीर्थ म्ह्णून प्राशन करीत असतात. प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, नदीचे पाणी दूषित करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष किरण पानकर, वाहतूक विभागाचे तालुकाध्यक्ष विलास धात्रक, उत्तर महाराष्ट्र ओबीसी उपाध्यक्ष चेतन जगताप आदी उपस्थित होते.
सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारीसंदर्भात अलीकडेच नाशिक येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साधू, महंतांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीतही गोदावरी स्वच्छतेचा विषय मांडण्यात आला होता. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, गोदावरीतील प्रदूषण रोखण्याकडे राजकीय पक्षही आता लक्ष देत आहेत.