जळगाव : बँका महिलांना कर्ज द्यायला तयार असतात. मात्र, गुलाबराव पाटील आणि इतर पुढाऱ्यांनी कर्ज मागितल्यावर कोणीच तयार होत नाही. कारण, सर्वात जास्त कर्ज बुडविणारी जात कोणती असेल, तर ती पुढाऱ्यांची आहे. तसे बँकांचेच म्हणणे आहे. काही नामांकित लोक बँकांचे कर्ज घेतात पण फेडत नाहीत, अशी कबुली शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आल्यानंतर सुमारे १८३७ लाभार्थींना विविध योजनांचा थेट लाभ देण्यात आला. त्याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महिलांच्या कर्जफेड करण्याच्या सवयीचे कौतूक करताना राजकारण्यांच्या कर्ज बुडविण्याच्या वृत्तीवर मिश्किल टिप्पणी केली. लाडक्या बहिणी गरजेनुसार बँकांचे कर्ज उचलतात. आणि वेळेवर भरण्याची काळजी देखील घेतात. त्यामुळे महिलांनी घेतलेल्या बँक कर्जाची शंभर टक्के परतफेड होत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

जिल्ह्यात जेवढ्या काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे, तिथे सर्वात जास्त गर्दी लाडक्या बहिणींची असते. शासनाने महिलांना एसटी बसमध्ये सवलत दिली. पण त्यामुळे तोट्यातील एसटी नफ्यात आली. एसटीला नफ्यात आणण्याचे काम कोणी केले असेल, तर ते लाडक्या बहिणींनी केले. हेच नाही गुलाबराव पाटील यांना निवडून देण्याचे कामही लाडक्या बहिणींनी केले आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी जाहीरपणे मान्य केले.

आमच्या सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण, लखपती दीदी, मुलींना मोफत शिक्षण, यासारख्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. पैकी लाडकी बहीण योजनेमुळे बँक खात्यावर दरमहा थेट १५०० रुपये येऊ लागल्याने महिलांचा घरातील रूबाब वाढला आहे. पूर्वी, महिला घरातील कर्त्या पुरूषांकडे खर्चासाठी पैसे मागायच्या. मात्र, आता पुरूष मंडळी महिलांकडे पैशांसाठी हात पसरतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या देशाच्या अर्थ खात्याची जबाबदारी देखील एका महिलेकडे आहे. कारण, कोणतीही महिला एकेका रुपयाचा हिशेब ठेवते. सरकारनेही महिलांसाठी बँकांचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. त्यांना कोणताही उद्योग- व्यवसाय सुरू करण्यासाठी मागेल तेवढे कर्ज देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.