नाशिक – गोदावरीसह अन्य नद्यांमध्ये दूषित पाण्यामुळे पानवेली फोफावतात. पानवेलींमुळे नद्या प्रदूषित होत आहेत. पानवेली असल्यास नदीचा प्रवाह खुंटतो. हवेतील प्राणवायू पाण्यात मिसळण्याची क्रिया मंदावते. शहरातील मलजल आणि कारखान्यातील सांडपाण्यातील दूषित घटक मिसळले की जलपर्णी वाढते. दूषित घटक नदीतील पाण्यात मिसळणे जोपर्यंत थांबणार नाही, तोपर्यंत पानवेलींची अनिर्बंध वाढ अटळ असल्याचे खडेबोल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यंत्रणांना सुनावले. पानवेलींमुळे नदीची नैसर्गिक पर्यावरणीय व्यवस्थाही धोक्यात आली आहे. त्यामुळे गोदावरीला पानवेलीमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सूचित केले.

गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. गमे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपायुक्त (करमणुक शुल्क) राणी ताटे, मनपा उपायुक्त अर्चना तांबे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गळ, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, याचिकाकर्ते निशीकांत पगारे, राजेश पंडित आदी उपस्थित होते.

मागील काही वर्षांपासून गोदावरीतील पानवेलींचे साम्राज्य हा चिंतेचा विषय ठरला आहे. दरवर्षी महानगरपालिका या पानवेली हटविण्यासाठी प्रयत्न करते. परंतु, पावसाळा संपल्यानंतर बहुतांश पात्र हिरव्यागार पानवेलीत लुप्त होऊन जाते. पानवेली काढण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने यंत्रणाही घेतलेली आहे. नाशिक शहराप्रमाणे ग्रामीण भागात गोदावरीचे पात्र पानवेलींच्या विळख्यात सापडले आहे. हजारो पक्ष्यांचे आश्रयस्थान असणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर बंधारा परिसराची त्यापासून सुटका झाली नाही. या पानवेलींमुळे आसपासच्या गावांना दुषित पाणी पुरवठा होत आहे. अलीकडेच पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमोर हा विषय उपस्थित झाला होता. त्यांनी पानवेली काढण्यासाठी राज्यात राबविलेल्या प्रयोगाची माहिती घेण्यास प्रशासनाला सांगितले होते. तसेच नांदुरमध्यमेश्वरमधील पानवेली काढण्यासाठी महानगरपालिकेकडील यंत्रसामग्रीचा वापर करण्याचे सूचित केले आहे. पानवेली फोफावण्यामागे पात्रात मिसळणारे दूषित पाणी हे मुख्य कारण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुठलेही सांडपाणी पात्रात जाऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहून काम करावे, असे गमे यांनी बजावले. रामकुंडावरील काँक्रिटीकरण थांबविण्यात आले असून महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांनी संयुक्त बैठक घेऊन त्यावर उपाय योजना सुचविण्यास सांगण्यात आले आहे. बैठकीत औद्योगिक क्षेत्रात काम करतांना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही किंवा प्रदूषण टाळून उद्योग चालविणाऱ्या शामला इलेक्ट्रा प्लेटर्स आणि एबीबी या औद्योगिक संस्थांचा सत्कार गमे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच शासकीय नोकरी करुन पर्यावरण व विजेची बचत करा, असा संदेश आपल्या पाठीला लावून जनजागृती करणारे महावितरणचे कर्मचारी योगेश बर्वे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.