नाशिक – पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ देवस्थानची दिंडी १० जून रोजी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली.
संत निवृत्तीनाथ संस्थानच्या वतीने पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. परंपरेप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथून विधिवत पूजा करून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पादुका चांदीच्या रथात विराजमान होतील. प्रस्थानाच्या मिरवणुकीनंतर टाळ मृदंगाच्या गजरात श्रींचे रथातून पंढरपूरकडे प्रस्थान होईल. याबाबत संस्थानचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर यांनी माहिती दिली. पालखी सोहळा हा अत्यंत वैभवशाली आणि परंपरेप्रमाणे होणार आहे. वारकऱ्यांना हव्या असणाऱ्या मूलभूत सुविधा देण्यात आल्या आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पालखी सोहळ्यात काही नवीन दिंड्या सहभागी होणार आहेत. वारी मार्गात त्या निवृत्तीनाथांच्या सोहळ्यात सहभागी होतील, असे ॲड. घोटेकर यांनी सांगितले.
पंढरपूरपर्यंत यंदा तीन बैलजोड्या रथासाठी असून साधारणतः ३० हजार वारकरी पालखी सोहळ्याबरोबर चालणार आहेत. अहिल्यानगरीतून यात वाढ होणार असून पंढरपूरपर्यंत एक लाख वारकरी निवृत्तीनाथांच्या रथाबरोबर चालतील, असेही घोटेकर यांनी नमूद केले.
पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वरजवळील पेगलवाडी येथील महानिर्वाणी आखाड्यात होणार आहे. वारकऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या मुक्कामात कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी देवस्थानच्या वतीने पाणी, फिरते शौचालय आदी व्यवस्था करण्यात आली आहे. पालखीचा मुक्काम त्र्यंबक, सातपूर, पंचवटी, पळसे, लोणारवाडी, खंबाळे, घारेगाव, गोगलगांव, राजुरी , राहुरी, डोंगरगण या ठिकाणी होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात २३ जून ते पाच जुलै या कालावधीत अहिल्यानगर, साकत, कर्जत, कोरेगांव, रावगांव, जेऊर आदी भागात मुक्काम राहील. यानंतर दिंडी पंढरपूरच्या वेशीवर मुक्काम करून पंढरपुरात दाखल होईल.
संत निवृत्तीनाथ संस्थान वेगवेगळे उपक्रम राबवित असते. संत निवृत्तीनाथांच्या वाड:मयाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी काही वर्षांपासून विश्वस्त मंडळ प्रयत्न करत आहे. निवृत्तीनाथांचे अध्यासन निर्माण व्हावे यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. – प्रा. अमर ठोंबरे ( विश्वस्त, संत निवृत्तीनाथ संस्थान, त्र्यंबकेश्वर)