राज्यात भाजप-शिवसेना युती सत्तेवर आल्यापासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात कोणत्या ना कोणत्या कारणावरून संकटात अडकत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी आक्रमक व्यूहरचनेची गरज असताना खा. सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्याने ती पूर्ण केल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादीत आलेली मरगळ झटकण्यास सुळे यांचा दौरा आणि त्यांची आक्रमक वक्तृत्व शैली सहाय्यभूत होऊ शकते. या दौऱ्यातील भाषणांमधून विरोधकही चकीत झाले आहेत.

युती सत्तेवर आल्यापासून उत्तर महाराष्ट्रात धुळे महापालिकेचा अपवाद वगळता इतरत्र राष्ट्रवादीसाठी फारसे आशादायक असे काही घडलेच नाही. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी ‘ईडी’च्या कोठडीत जावे लागले. ‘भुजबळ म्हणजे राष्ट्रवादी’ असे स्वरूप असलेल्या नाशिकमध्ये त्यामुळे पक्षाची अतिशय बिकट झाली.  भुजबळांविना सैरभेर झालेल्या राष्ट्रवादीतून आपले पुढील राजकीय भविष्य सावरण्यासाठी स्थानिक पातळीवर काही नगरसेवक, पदाधिकारी पक्ष सोडून भाजप किंवा शिवसेनेत गेले. नाशिक महापालिका निवडणुकीचे प्रशासकीय पातळीवर एकेक टप्पे पार पडत असताना राजकीय पातळीवरही घडामोडींना वेग आला आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे आव्हानही उभे ठाकले आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी लागणारे ‘बळ’ च हरविल्यामुळे नाशिक जिल्ह्य़ाप्रमाणेच जळगाव, नंदुरबारमध्येही पक्ष चाचपडत आहे. जळगाव जिल्ह्य़ात राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असलेले सतीश पाटील यांना पक्षाला लागलेली गळती थांबविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. भाजपमध्ये गटबाजी असूनही पक्षाचा विस्तार होत असताना आणि दुसरीकडे शिवसेनेत गुलाबराव पाटील यांच्या रूपाने राज्यमंत्रिपद आणि ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन हे पुन्हा सक्रिय झाल्याने राष्ट्रवादी मात्र सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. नंदुरबारमध्ये काँग्रेसने सत्तेवर पक्की मांड ठोकली असल्याने आणि भाजपही सत्तेचा फायदा करून घेत जिल्ह्य़ात हातपाय पसरवित असताना राष्ट्रवादीची स्थिती सध्यातरी बिकट आहे.

कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी

सुप्रिया सुळे यांनी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या चारही जिल्ह्य़ांच्या ठिकाणी घेतलेल्या कार्यकर्ता व शेतकरी मेळाव्यांमध्ये सत्ताधाऱ्यांवर त्यातही प्रामुख्याने मुख्यंत्र्यांवर ज्या भाषेत टिकेचे आसूड ओढले ते कार्यकर्त्यांसाठी नवीन होते. राष्ट्रवादीला उभारी येण्यासाठी अशाच आक्रमकतेची गरज असल्याची प्रतिक्रिया उत्तर महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुखांनी व्यक्त करण्याचे कारणही तेच. भुजबळांशी न पटल्याने काही वर्षांपासून पक्षात निष्क्रिय असणाऱ्यांनी या दौऱ्यात सुळे यांच्याशी घेतलेली भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.