नवी मुंबई : शहरात मागील आठवड्यात झालेल्या पहिल्याच पावसामुळे बेलापूर पाण्यात गेले होते. पंपहाऊसच्या कामात भरतीचे पाणी आत येण्यासाठी असलेले २८ झडपा (फ्लॅपगेट) पंपहाऊसच्या ठेकेदाराने बंद केल्याचे आढळून आले होते. या झडपा उघडल्या आहेत. दरम्यान, त्या उघडल्या असल्या तरी पाण्याचा निचरा होण्यासाठी अतिरिक्त पंप लावावेच लागणार असल्याचे मत माजी सभागृह नेते डॉ.जयाची नाथ यांनी मंगळवारी पाहणीनंतर व्यक्त केले आहे.
पालिकेच्या सेक्टर १२ येथील पंपहाऊसच्या चुकीच्या कामामुळे व ठेकेदाराच्या व पालिकेच्या दुर्लक्षपणामुळे बेलापूर विभागातून खाडीत पाणी जाण्याचा मार्गच तसेच त्याचे २८ झडपा ठेकेदाराने बंद केल्यामुळेच बेलापूरला पावसाचा तडाखा बसला आणि हजारो नागरिकांचे हाल झाले, तर दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे पालिकेने जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता.
पंपहाऊसच्या ठिकाणी बेलापूरकडून येणारे पाणी जाण्याच्या मार्गात पंपहाऊसच्या कामामुळे मोठा मातीचा भराव होता. तो भराव पालिकेने काढला असून भरती ओहोटीच्यावेळी समुद्रातून ये जा करणाऱ्यासाठी लावण्यात आलेले २८ फ्लॅप गेट सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडूनही या पंपहाऊसची बुधवारी पाहणी करण्यात येणार आहे.
पंपहाऊसच्या कामाची मंगळवारी पाहणी केली. पालिकेने बऱ्याच प्रमाणात साफसफाई केली आहे. बंद केलेले फ्लॅप गेट परत सुरू करण्यात आले आहेत. मात्र फ्लोटिंग जेसीबी लावून गाळ काढला तरच पाण्याचा निचरा होईल. – डॉ.जयाजी नाथ, माजी सभागृह नेते.