पनवेल : विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका बांधण्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे स्वप्न भंग होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उच्चपदस्थांनी एमएसआरडीसीकडे दोन महिन्यांपूर्वी मोरबे ते जेएनपीटी हा महामार्ग बांधण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र एमएसआरडीसी यंत्रणेकडून अद्याप या प्रस्तावावर कोणताही प्रतिसाद न दिल्याने नेमका एमएसआरडीसी प्रशासनाला मार्ग बांधण्यात रस आहे की महामार्गाच्या अधिकारशाहीत अशी चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिल्ली मुंबई महामार्गातील पॅकेज १७ मधील शिरवली गावाजवळील माथेरान डोंगररांगाच्या खाली दोन बोगद्याचे काम पूर्ण केले आहे. सध्या या बोगद्यातील रस्त्याचे आणि वीज व्यवस्थेचे अंतिम टप्प्याचे काम सुरू आहे. ८० टक्के बोगद्याचे काम पूर्ण झाले असून यंदाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत या बोगद्यातून दुहेरी वाहतूकीसाठी खुला केला जाऊ शकेल. तसेच बोगद्यातून आरपार जाऊ शकल्याने पनवेल (मोरबे) ते बदलापूर हे अंतर अवघ्या १० मिनिटांवर येणार आहे. बोगद्यांसोबत महामार्गाचे काम ७० टक्केपेक्षा जास्त पूर्ण झाल्याने पुढील काही महिन्यात बदलापूर येथून मोरबे गावापर्यंतचा रस्ता पूर्ण झाला आहे. मात्र मोरबे गाव ते कोन या गावापर्यंतचे काम कागदावरच आहे.
विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका या महामार्गावर करण्याचे नियोजन होते. मात्र निधी अभावी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना हा महामार्ग करणे सध्या अशक्य आहे. पनवेल तालुक्यातील ३९ गावांमधील सूमारे अडीचशे हेक्टर जमीन या महामार्गात बाधित होत आहे. यासाठी सरकारला सात हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी लागेल. आतापर्यंत १७०० कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली आहे. अजूनही पनवेलमधील ३९ गावांमधील शेतकऱ्यांसाठी सुमारे ५३०० कोटी रुपयांची गरज लागणार आहे.
याबाबत एमएसआरडीसी प्रशासनाची नेमकी भूमिका काय हे जाणून घेण्यासाठी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्याशी वारंवार संपर्क साधला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर महामार्गातील बोगद्यातील अंतर्गत काम ८० टक्के व रस्ते बांधकाम हे ७० टक्के पूर्ण झाले असून मोरबे गावापर्यंत पॅकेज १७ डिसेंबर महिन्यात सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. या दरम्यान दीड ते दोन महिन्यांपूर्वी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना मोरबे ते कोन या दरम्यानचा महामार्ग बांधण्याची तयारी दर्शविल्याचे पत्र दिले असून त्यावर अजून काेणतेच उत्तर आले नसल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.