नवी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे असताना नवी मुंबईत महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या कल्याण तालुक्यातील १४ गावांचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्तांच्या माध्यमातून शहरातील प्रभागांची रचना नव्याने केली जाणार आहे. या रचनेत १४ गावांचाही समावेश करण्याची तयारी महापालिका प्रशासनाकडून केली जात असताना वनमंत्री गणेश नाईक आणि भाजप नेत्यांकडून त्यास विरोध होत आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमका कोणता निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण तालुक्यातील दहिसर, निगु, मोकाशी पाडा, नावळी, भांडर्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळन, बाळे आणि दहिसर मोरी या गावांचा नवी मुंबई महापालिकेत सामावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. भौगोलिकदृष्ट्या ही गावे ठाणे महापालिका हद्दीला लागून आहेत. असे असले तरी लोकसभा निवडणुकीतील मतांचे गणित लक्षात घेता या गावांचा सामावेश नवी मुंबईत करण्यात आला. सुरुवातीच्या कालखंडात ही गावे नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतच होती. मात्र, वाढीव मालमत्ता कराच्या मुद्द्यावरून या गावांमध्ये महापालिका नको असे आंदोलन झाले. त्यानंतर ही गावे नवी मुंबई महापालिका हद्दीतून वगळण्यात आली होती.
मागील १५ ते २० वर्षांच्या कालावधीत नागरी सुविधांअभावी या गावांचा विचका झाला आहे. महापालिकेशिवाय विकास होत नाही हे आता येथील ग्रामस्थांच्या लक्षात येऊ लागल्याने नवी मुंबईत सामावेश करा असा आग्रह गावातील नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे धरला. खासदार शिंदे यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकरवी या गावांचा नवी मुंबईत सामावेश करून घेतला. हा निर्णय बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजप आणि शिंदेसेनेत वादाचे प्रमुख कारण ठरू लागले असून महापालिका निवडणुकांची तयारी सुरू झाल्याने या मुद्द्यावरून वनमंत्री गणेश नाईक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, या गावांमधील अतिक्रमणे तसेच इतर जागांच्या विकासावर महापालिकेचे लक्ष आहे, असा दावा मध्यंतरी अर्थसंकल्प मांडत असताना महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केला होता. तसेच राज्य सरकारकडून या गावांच्या विकासासाठी पाच ते सहा हजार कोटी रुपये मिळावेत ही मागणी कायम असल्याचेही त्यांनी सांगितले होते. असे असले तरी अर्थसंकल्पात या गावांच्या विकासासाठी जेमतेम १६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. राज्य सरकारच्या निर्णयानंतरही महापालिकेने अजूनही या गावात कोणतेही ठोस असे विकासकाम केलेले नाही. नाईक आणि शिंदे यांच्यातील राजकीय संघर्षाचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.
गावे वगळण्याच्या हालचाली?
– महापालिका निवडणुकांसाठी प्रभागांची रचना करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. कल्याण तालुक्यातील १४ गावे सध्या महापालिका हद्दीत असल्यामुळे या गावांमध्येही काही प्रभाग तयार करावे लागणार आहेत.
– वनमंत्री गणेश नाईक यांनी ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्यास यापूर्वीच विरोध केला आहे. त्यामुळे प्रभाग रचना सुरू होण्यापूर्वीच नाईक यांनी पुन्हा एकदा ही गावे महापालिका हद्दीतून वगळावीत यासाठी आग्रह धरण्यास सुरुवात केल्याचे समजते.
– एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेनेला ही १४ गावे नवी मुंबईतच हवी आहेत. मात्र कोणत्याही परिस्थितीत ही गावे महापालिका हद्दीतून वगळली जावीत यासाठी नाईक यांच्याकडून मोर्चेबांधणी केली जात असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
-१४ गावांचा हा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडण्याची तयारी नाईक यांनी केल्याचे सांगितले जाते. या मुद्दयावर अजूनही नाईक अथवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.
पूर्वीपासून ही गावे नवी मुंबई महापालिकेत आहेत. आता तरुण पिढीलाही ही गावे पालिकेत असावी असे वाटते. पालिकेच्या माध्यमातून झटपट विकास होऊ शकतो. त्यामुळे आगामी पालिकेच्या प्रभाग रचना या भागात प्रशासनाकडून करण्यास सुरुवात झाल्यावर त्याला आम्ही १४ गावचे ग्रामस्थ सहकार्य करू. – गणेश जेपाल, उपतालुकाप्रमुख, कल्याण ग्रामीण