पावसाळा सुरू व्हायच्या आधीच कोकण रेल्वे प्रशासनाने मुसळधार पावसात उद्भवणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नवी मुंबईतील बेलापूर भवन येथे मंगळवारी (३ जून) आयोजित पत्रकार परिषदेत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी यंदाच्या पावसाळ्यासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.
दरवर्षी कोकण रेल्वे मार्गावर पावसामुळे दरड कोसळणे, रुळांवर पाणी साचणे, पूलांवर ताण येणे, तसेच वाऱ्याचा वेग अचानक वाढणे या समस्या उभ्या राहतात. यंदाही या सर्व बाबींचा विचार करून रेल्वे प्रशासनाने संपूर्ण पावसाळा काळ लक्षात घेता सुरक्षेची सर्वंकष योजना आखली आहे.
यंदाच्या पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी १५ जून ते २० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत करण्यात येणार आहे. या काळात हवामान खात्याशी रोजचा समन्वय साधला जाणार असून, एका दिवसात १०० मिमीहून अधिक पाऊस झाल्यास रेल्वेसेवा तात्पुरती थांबवण्यात येईल आणि हवामान सुधारल्यानंतरच ती पुन्हा सुरू केली जाईल. ही कार्यवाही प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे २४ तास कार्यरत राहणारे नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच चिपळूण, रत्नागिरी, वेरणा, मडगाव, कारवार आणि उडपी येथे वैद्यकीय पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.
संवेदनशील ठिकाणी ३६५ कर्मचारी सतत तैनात
रेल्वे मार्गावरील अतिसंवेदनशील भागांवर ३६५ प्रशिक्षित कर्मचारी दिवस-रात्र कामावर तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, रत्नागिरी, चिपळूण, कणकवली आणि वेरणा येथे आपत्कालीन स्थितीत तत्काळ हस्तक्षेप करता यावा यासाठी खोदकामासाठी लागणारी यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये बिघाड झाल्यास माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमाळी, कारवार आणि उडपी येथे टॉवर वॅगन्स सतत तयार ठेवण्यात आले आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
पूलांवरील वाऱ्यावर अचूक नजर
कोकण रेल्वेमार्गावरील चार महत्त्वाचे पूल — पनव्हल व्हायाडक्ट, मांडवी, झुआरी आणि शरावती — हे जोरदार पावसात आणि वाऱ्यात अत्यंत संवेदनशील मानले जातात. याठिकाणी यंदा वाऱ्याचा वेग अचूकपणे मोजण्यासाठी अॅनिमोमीटर्स बसवण्यात आले आहेत. वाऱ्याचा वेग धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यास रेल्वे प्रशासन तात्काळ सेवा थांबवण्याचा निर्णय घेऊ शकणार असून त्यामुळे अपघात रोखण्यास मदत होईल. कोकण रेल्वे प्रशासनाकडून ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
प्रवाशांसाठी ‘रिअल टाइम’ माहिती सुविधा
प्रवाशांना रेल्वेगाड्यांची स्थिती http://www.konkanrailway.com या अधिकृत संकेतस्थळावर आणि हेल्पलाइन क्रमांक 139 वरून रिअल टाइममध्ये मिळू शकते. त्यामुळे पावसाळ्यातील संभाव्य विलंब किंवा बदल यांची माहिती वेळेत मिळू शकते. ही सुविधा प्रवाशांच्या मदतीसाठी कार्यरत ठेवण्यात आल्याची माहितीही कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.