नवी मुंबई : राज्यातील माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिलेल्या आश्वासनांची अद्यापही पूर्तता झालेली नाही. प्रशासनाने बैठकही घेतली नसल्याने संतप्त झालेले माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी अखेर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नरीमन पॉईंट येथील मुख्य कार्यालयात आयोजित जनता दरबारात नरेंद्र पाटील यांनी शिष्टमंडळासह कामगार मंत्र्यांना निवेदन सादर केले. महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस, माजी आमदार आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष असलेल्या पाटील यांनी, कामगार मंत्रालयाशी संबंधित विविध विभागीय अधिकाऱ्यांची तातडीने संयुक्त बैठक बोलावण्याची मागणी यावेळी केली.

माथाडी कामगारांच्या रोजच्या अडचणी, नोंदणी प्रक्रियेतील अडथळे, बोर्डांच्या पुनर्रचनेची गरज, माथाडी अधिनियम सुधारणा, कार्यालयीन सेवेत कामगारांच्या मुलांना प्राधान्य, पगार आणि लेव्ही संदर्भातील प्रलंबित प्रकरणे, तसेच पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, लातूर, धाराशिव आदी मंडळांतील विशिष्ट समस्यांबाबत मंत्री फुंडकर यांना निवेदनात सविस्तर मागण्या करण्यात आल्या.

“आम्ही अनेकदा निवेदने दिली. मंत्री महोदयांनी आश्वासन दिले होते की १० ते १५ दिवसांत बैठक घेऊन प्रश्न सोडवले जातील. मात्र, आजतागायत कोणतीही बैठक झाली नाही. हे दुर्लक्ष अस्वीकार्य आहे. त्यामुळे आता माथाडी कामगारांमध्ये असंतोष आहे. सरकारने तत्काळ पावले उचलली नाहीत, तर आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या शिष्टमंडळात युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस दिलीप खोंड, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, सेक्रेटरी कृष्णत पाटील, प्रशांत सणस आदींचा समावेश होता.