पालघर: पालघर जिल्ह्याची स्थापना होऊन १० वर्षांचा कार्यकाळ उलटल्यानंतर प्रथमच आपल्या कार्यक्षेत्रात तीन वर्षांपेक्षा अधिक काळ झालेल्या ८० अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तालुका बाहेर बदल्या करून जिल्हाधिकारी यांनी महसूल आस्थापनाची उलथापालथ केली आहे. यामुळे पुढील काही दिवस महसूल विभागासाठी अडचणीचे जाणार असले तरी आगामी काळात परिसराचा विकास साधण्यासाठी नव्या कर्मचाऱ्यांची फळी कार्यरत राहणार आहे

जिल्ह्यात अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी अथवा तालुक्यात व विशेषतः किनारपट्टीच्या चार तालुक्यांमध्ये अनेक कर्मचारी अधिकारी ठाण मांडून बसले होते. अशा कर्मचाऱ्यांनी जवळपासच्या गावांमध्ये किंवा इतर महत्त्वाच्या ठिकाणी बदल्या करून आपले वर्चस्व निर्माण केले होते. जिल्ह्याचा नव्याने पदभार स्वीकारलेल्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी महसूल आस्थापनातून ३८ ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), २७ महसूल सहाय्यक, १० मंडळ अधिकारी व पाच सहाय्यक महसूल अधिकारी यांचे बदली ३० मे च्या रात्री उशिराने जाहीर केली. विशेष म्हणजे बदली होणाऱ्या या कर्मचाऱ्यांना विद्यमान कार्यक्षेत्र व तालुका सोडून इतर तालुक्यात पाठवण्यात आल्याने प्रस्थापित कर्मचाऱ्यांना धक्का बसला. मात्र नागरिकांमधून तसेच गौण खनिज व्यवसायिकांकडून या बदली सत्राचे स्वागत होऊन समाधान व्यक्त होऊ लागले आहे.

जिल्हा स्थापन झाल्यापासून कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित असल्याने अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासन चालवणे आव्हानात्मक होते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची बदली केली तरीही त्यांना प्रतिनियुक्ती करून पूर्वीचेच काम करण्याची पद्धत अवलंबली जात होती. याचा लाभ काही महसूल कर्मचाऱ्यांनी घेऊन त्यांच्याकडे तीन पेक्षा अधिक वर्ष एकाच कार्यक्षेत्रात काम करीत राहिले होते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचे स्थानिक मंडळींशी हितसंबंध जोडले जाऊन महसूल कामांमध्ये कामचूकारपणा, दुर्लक्ष व गैरप्रकारांना छुप्या पद्धतीने साथ देण्याचे काम केले जात होते. मात्र पदभार स्वीकारलेल्या जिल्हाधिकारी यांनी बदल्यांसाठी शासकीय नियमांचे काटेकोर पालन करावे असे संबंधित अधिकारी वर्गाला सुचित करून तसेच या बदली प्रक्रियेवर स्वतः देखरेख करून प्रस्थापित महसूल कर्मचाऱ्यांना धक्का दिला आहे.

बदली प्रक्रिये दरम्यान पात्र महसूल अधिकाऱ्यांना तीन ठिकाणाची पसंती क्रम मागवण्यात आला होता. त्यापैकी अधिकतर कर्मचाऱ्यांना त्यांनी दिलेल्या पसंतीनुसार नव्याने नेमणूक देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाचे निरीक्षण करण्यासोबत त्यांचा त्या पदावरील कार्यानुभव हे देखील लक्षात घेतले असून त्याला लगतच्या तालुक्यांमध्ये किंवा परिसरात अधिकतर सामावून घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. काही ठिकाणी मागणी केलेल्या पदी इतर जेष्ठ सहकारी यांची नेमणूक झाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना इतरत्र बदली करणे भाग पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

आस्थापना क्षेत्र बदलल्याने बदल्या झाले शक्य

अनेक वर्षांपासून उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांच्याकडे आस्थापना अधिकार क्षेत्र असल्याने अधिकतर महसूल कर्मचाऱ्यांची बदली तालुक्यात अथवा प्रांत क्षेत्रात होत असे. मात्र दोन वर्षांपूर्वी आस्थापना अधिकार क्षेत्र पूर्ण जिल्ह्यासाठी विस्तारित करण्याचा शासनाने निर्णय घेतल्याने त्याची प्रथमच प्रभावी अंमलबजावणी पालघर मध्ये झाल्याने प्रस्थापित असणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांना धक्का देण्यात आला आहे.

काही दिवस गैरसोयीचे

आपल्याला आवडीच्या ठिकाणी बदली मिळेल या आशेवर बसलेल्या अनेक प्रस्थापितांना धक्का दिल्याने महसूल कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तालुका बाहेरून येणाऱ्या मंडळींना आपल्या कार्यक्षेत्रातील माहिती करून घेण्यास काहीसा विलंब लागणार असून अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत असणारे खाजगी ऑपरेटर व उमेदवार (कॅंडिडेट) सोबत दुसऱ्या सजेवर (गावावर) घेऊन गेल्याने संबंधित कार्यालयात जुनी प्रकरणात दस्तावेज व संदर्भ शोधून काढले व इतर काम करण्यास काही दिवस अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महसूल गोळा करण्यासोबत जिल्ह्याचा विकास साधने हे महत्त्वाचे असून महत्त्वाच्या सजा रिक्त राहू नये किंवा त्या ठिकाणी अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात येऊ नये या दृष्टीने शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व त्यासंबंधी असणाऱ्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने बदल्या करण्यात आल्या आहेत. या सर्व बदल्या प्रशासकीय स्वरूपाच्या असून विविध निकषाद्वारे अग्रक्रम ठरवून बदल्या करण्यात आल्या. – डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हाधिकारी