पालघर :पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कृषि निविष्ठा (बियाणे, खते, कीटकनाशके) उपलब्ध व्हावीत याकरिता कृषि विभागामार्फत जिल्हास्तरीय एक आणि तालुकास्तरीय आठ अशी एकूण नऊ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे शेतकऱ्यांच्या कृषि निविष्ठांशी संबंधित तक्रारींचे तातडीने निवारण करणे सोपे होणार आहे.

महाराष्ट्र राज्य कृषि आयुक्तालय, पुणे यांच्या सूचनांनुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी निविष्ठांशी संपत्ती समस्यांचे त्वरित आणि प्रभावी निवारण करण्याच्या उद्देशाने जिल्हा करिता भरारी पथक गठित करण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय भरारी पथकाचे प्रमुख जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी यांच्या नेतृत्वाखाली हे पथक कार्यरत आहे.

प्रत्येक तालुक्यात तालुका कृषि अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरीय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये तालुका कृषि अधिकारी (पथक प्रमुख), कृषि अधिकारी (तालुका कार्यालय), निरीक्षक वजने व मापे, मंडळ कृषि अधिकारी आणि गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (पंचायत समिती) यांचा समावेश आहे. ही पथके तालुकास्तरावर शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करणार आहेत.

कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा मिळाव्यात आणि त्यांची कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून या भरारी पथकांमुळे शेतकऱ्यांना तक्रार निवारणाची प्रभावी यंत्रणा उपलब्ध झाली आहे, शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे.

पथक प्रमुखांचे संपर्क

जिल्हास्तरीय भरारी पथकाचे प्रमुख कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद पालघर, सोमनाथ पिंजारी (संपर्क: ८३२९०७३९३४) यांच्या नेतृत्वाखाली हे पथक कार्यरत आहे. या पथकात विश्वास बर्वे (उपविभागीय कृषि अधिकारी, संपर्क: ९४०३५१००७५),  ए.जे. राऊळ (मोहीम अधिकारी, संपर्क: ९०४९४९७३३९), काकासाहेब भालेकर (निरीक्षक वजने व मापे, संपर्क: ८४२५०३७६८६) आणि लक्ष्मण लामकाने (जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, संपर्क: ९९२१५४३४९९) हे सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. या पथकामध्ये कृषि निविष्ठांशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी शेतकरी संपर्क क्रमांकांवर थेट पथक प्रमुखांशी संपर्क साधू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाच्या निविष्ठा मिळाल्या असतील किंवा फसवणुकीचा अनुभव आला असेल तर त्यांनी तातडीने जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय भरारी पथकांशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी नोंदवून त्यांचे त्वरित निवारण करून घ्यावे.- सोमनाथ पिंजारी, जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख