कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रमुख गावे, पेट्रोल पंप, हॉटेल्स अशा विविध ठिकाणी सेवा रस्त्यांची कामे गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी कामे संथगतीने आणि काही ठिकाणी बंद आहेत. त्यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत.
मुंबई-अहमदाबाद हा महामार्ग दळणवळणासाठी एक महत्त्वाचा महामार्ग म्हणून ओळखला जातो. महामार्गावर ठिकठिकाणी उड्डाणपूल व साधारणपणे ३० ते ३५ सेवा रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी त्यांचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसत आहे. सोमटा, चिंचपाडा, कोल्हाण, चारोटी, आंबोली, धुंदलवाडी, दापचरी, सुत्रकार, आच्छाड या सर्व मुंबई -अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या गावाजवळील पूल पूर्ण असतानादेखील सेवा रस्त्यांचे काम मात्र, अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. तर काही ठिकाणी अनेक महिन्यांपासून ते काम बंद आहे. सेवा रस्त्याचे काम हे पूर्ण झालेले नसल्याने वाहनचालकांना दररोज विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
चारोटी येथे एशियन पेट्रोल पंपाकडे वळण्यासाठी सेवा रस्ता तयार केला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हॉटेल अल्फाच्या समोरून हा रस्ता सुरू होतो परंतु पेट्रोल पंपाजवळ रस्ता अपूर्ण आहे. तवा गावाजवळ कोल्हानकडे जाण्यासाठी सेवा रस्ता आहे तोही अपूर्ण आहे, असे बऱ्याच ठिकाणी सेवा रस्ते अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे वाहनचालक सेवा रस्त्यावर आल्यानंतर त्यांना पुढील अपूर्ण कामांचा अंदाज येत नाही, आणि वाहन नियंत्रित न झाल्याने अपघात होत आहेत.
टोल कंपनीचे दुर्लक्ष
राष्ट्रीय महामार्गाची टोल वसुली करणारी कंपनी मात्र फक्त टोल वसुलीचे काम करताना दिसत आहे. या अपूर्ण सेवा रस्त्याची कामे पूर्ण करण्यासाठी काहीही हालचाली होताना दिसत नाहीत. टोल प्रशासनाशी संपर्क केला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तरी लवकरात लवकर या अपूर्ण सेवा रस्त्यांची कामे पूर्ण करावीत अशी मागणी वाहनचालक तसेच परिसरातील नागरिक करत आहेत.
सागरी महामार्गावर कचऱ्याचे साम्राज्य
डहाणू, चिंचणी, तारापूर या सागरी महामार्गाच्या दुतर्फा झाडाझुडप्यात बेकायदा कचरा मोठय़ा प्रमाणात टाकली जात आहे. त्यामुळे महामार्गाला कचराभूमीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला असून भरतीच्या पाण्यालाही या कचऱ्याचा अडथळा होत आहे. डहाणूच्या बाह्यवळण रस्त्यावरही मोठय़ा प्रमाणात कचरा टाकला जात आहे. नगरपरिषदेने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
डहाणू तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींपैकी एकाही ग्रामपंचायतीकडे कचराभूमी नसल्याने रोज घराघरांतून निघणाऱ्या घनकचऱ्याची विल्हेवाट कशी करावी, असा प्रश्न ग्रामपंचायतीला पडला आहे. गावागावांतून निघणाऱ्या कचऱ्यासाठी ग्रामपंचायत ठेकेदाराची नियुक्ती करते; परंतु ठेकेदार मिळेल त्या जागेवर घनकचरा टाकत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. चिंचणी-तारापूरच्या बाह्यवळण रस्त्यावर दररोज मोठय़ा प्रमाणात कचरा टाकला जातो, तर रात्रीच्या वेळी बोईसर एमआयडीसी येथील काही कंपन्यांचे रसायनयुक्त कचरा या चिंचणी तारापूर रस्त्यावर फेकला जात आहे. दिवसभर या कचऱ्यात मोकाट जनावरे फिरत असतात. अनेक वेळा या मोकाट जनावरांमुळे या रस्त्यावर अपघातदेखील झाले आहेत. पालघर जिल्हा परिषदेने गावागावांत कचराभूमी उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.