पालघर : एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानचे पंचनामे झाले असून जिल्हा प्रशासनाने नुकसान भरपाईसाठी राज्यस्तराकडे निधीची मागणी केली आहे. मागणी केलेल्या निधीचा तपशील घेऊन राज्यस्तरावर आपण पाठपुरावा करून जिल्हावासीयांना लवकरात लवकर नुकसान भरपाईची रक्कम देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली.

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाई च आढावा घेण्यासाठी  पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १५ एप्रिल रोजी तर पालकमंत्री यांनी २४ एप्रिल रोजी आढावा बैठक घेतली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून मान्सून सुमारे महिनाभर उशिराने दाखल होत असताना यंदा दमदार पावसाने मे महिन्यात हजेरी लावल्याचे पालकमंत्री यांनी नमूद केले. त्यामुळे महावितरण कंपनीला काही ठिकाणी आवश्यकतेनुसार दुरुस्तीची कामं करता न आल्याने नागरिकांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी नमूद केले. महावितरणच्या दुरुस्तीच्या कामांसाठी जिल्हा विकास समितीमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

एप्रिल महिन्यात, मे महिन्याच्या ६ ते ८ व २३- २४ तारखेला झालेल्या पावसामुळे घरांची झालेली पडझड, कृषी क्षेत्रातील नुकसान, सार्वजनिक मान्यतेचे नुकसान तसेच मच्छीमार समुदायाचे शासकीय नियमाच्या अनुषंगाने झालेले भरपाईच्या अनुरूप झालेल्या नुकसानीची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागले यांनी सादर केली. या भरपाई साठी शासनाकडे मागणी केलेली एकूण रकमेचा तपशील घेऊन आपण या प्रकरणात शासनाकडे पाठपुरावा करू असे त्यांनी या बैठकीत नमूद केले. जिल्ह्यात व विशेषता पालघर तालुक्यात विटभट्टी मालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांचे देखील सर्वेक्षण करण्यात यावे अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.

करोना आजाराचा पुन्हा शहरी भागात शिरकाव झाला असून आपल्या जिल्ह्यात देखील करोनाची पुन्हा लागण होईल या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने सज्ज राहणं आवश्यक असल्याचे सांगितले. इमारत, पाणी, वीजपुरवठा व इतर सोयी सुविधांनी सुसज्ज असणारे तालुकास्तरावर निदान एक कोविड केंद्र उभारण्याच्या  सूचना त्यांनी दिल्या. करोना संक्रमणाच्या दृष्टीने आवश्यक औषधोपचार, सॅनिटायझर, मास्क व इतर सामग्री ची आवश्यक प्रमाणात खरेदी करून या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागाने तयारी करावी असेही त्यांनी आवाहन केले.

जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या सातत्याने कमी होत असली तरीही जिल्हा कुपोषणमक्त करण्यासाठी  जनजागृती व आवश्यक उपाय योजना आखण्याचे त्यांनी आरोग्य विभागाला सांगितले. कुपोषित बालकांना सुदृढ व सशक्त बनविण्याच्या दृष्टिकोनातून लागणाऱ्या आहारासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी देण्याची तयारी त्यांनी दर्शवली.

येत्या काही दिवसात शाळा पुन्हा सुरू होत असून शाळेच्या वर्गांची साफसफाई तसेच शाळेजवळ च परिसर स्वच्छ करून सर्प दंश, विंचू दंश टाळण्याच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे दंश झाल्यास आवश्यक औषधांचा पुरेशा प्रमाणात साठा असावा असे त्यांनी सांगितले. पावसाळ्यात साथीचे विकार होणार नाहीत या दृष्टीने आवश्यक खबरदारी अन्न व औषध प्रशासनालय व आरोग्य विभागाने घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बी बियाणे व खतांची उपलब्धता राहील यासाठी खबरदारी घ्यावी तसेच बोगस बियाणे विकणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे देखील त्यांनी सुचित केले

सातपाटी येत धूप प्रतिबंधक बंधाऱ्यच्या दुरुस्तीसाठी निधी

सातपाटी येथे उत्तरेच्या बाजूला असणाऱ्या सुमारे १.७० किलोमीटर लांबीच्या बंधार्‍याची अवस्था बिकट झाली असून त्याच्या दुरुस्तीसाठी पतन विभागाने अंदाजपत्रक तयार केले आहे. तरीही जुलै व ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या मोठ्या उधाणापासून किनाऱ्यालगतच्या घरांचे संरक्षण करण्यासाठी हंगामी दुरुस्ती करणे गरजेचे असल्याच्या मागणीची पालकमंत्री यांनी पुष्ट केली. ग्रामपंचायतीने दुरुस्तीचे काम वाजवी दरात करून घ्यावे व त्यासाठी आमदार निधी सोबत जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधी मधून निधी देण्यात येईल असेही पालकमंत्री यांनी सांगितले.

महामार्गांविषयी नाराजी

पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज सकाळी निघालेल्या पालकमंत्री यांना तुफान वाहतूक  कोंडीचा सामना करावा लागला. आपल्याकडे सोबतीला पोलीस यंत्रणा असताना अशी परिस्थिती उद्भवत असेल तर आजारी व गंभीर असणाऱ्या रुग्णांची अवस्था काय होत असेल असा सवाल त्यांनी उपस्थित करून महामार्गाच्या अवस्थेबद्दल चिंता व नाराजी व्यक्त केली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे कक्रिटीकरणाचे काम सुमार दर्जाचे असून संबंधित विभागाने त्याचा ताबा घेऊ नये, दुभाजकाला असणारे बेकायदा छेद बंद करून घ्यावेत तसेच महामार्ग लगत स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महामार्ग लगत असणारी हॉटेल व दुकानांमध्ये सेवा घेणाऱ्या वाहन चालकांकडून आवश्यक सावधगिरीचा उपाय योजना आखण्याची पोलीस अधीक्षक यांना सांगितले. त्याचप्रमाणे अवजड वाहनांना रस्त्याच्या डावीकडून वाहतूक करणे अपेक्षित असताना त्याचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभाग तसेच पोलिसांना दिल्या. तसेच वाडा भिवंडी रस्त्याला रस्ता कोण म्हणेल असा उपरोधिक सवाल उपस्थित करून अपघातामध्ये हजारो जीव गमावलेल्या रस्त्याच्या उभारणीसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित बैठक घ्यावी व नव्याने हाती घेतलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करावे असे त्यांनी सुचित केले.