चीन ब्रह्मपुत्रेचा प्रवाह रोखू शकतो, या दाव्याचे खंडन आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी केले आहे. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे वरिष्ठ सहाय्यक राणा इहसान अफझल यांनी दावा केला की, पाकिस्तानबरोबरचा सिंधू जल करार रद्द केल्याने चीन भारताकडे जाणारा ब्रह्मपुत्रेचा प्रवाह रोखू शकतो. फझल यांनी जिओ न्यूजला सांगितले, “जर भारताने पाकिस्तानकडे जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला तर चीनही असेच करू शकतो. पण, जर अशा गोष्टी घडल्या तर संपूर्ण जग युद्धात अडकेल,” असे ते म्हणाले होते.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्तानने भारताला याचे परिणाम भोगण्याची धमकी दिली होती. अनेक पाकिस्तानी नेत्यांनी भारताच्या या पावलाला युद्धाची कृती म्हटले. परंतु, १० मे रोजी दोन्ही देशातील लष्करी कारवाया थांबवण्यासाठी एकमत झाल्यानंतरही भारताने या कराराचे निलंबन कायम ठेवले आहे.

हिमंता बिसवा सरमा यांनी पाकिस्तानवर ओढले ताशेरे

हिमंता बिसवा सरमा यांनी ब्रह्मपुत्रेचे पाणी अडवण्याची चीनची शक्यता फेटाळून लावली. पाकिस्तानच्या धमकीला उत्तर देत सरमा म्हणाले, “भारताने कालबाह्य सिंधू जल करार रद्द केल्यानंतर पाकिस्तान आता आणखी एक बनावट धोका निर्माण करत आहे. तो म्हणजे, “जर चीनने ब्रह्मपुत्रेचे पाणी भारताला थांबवले तर काय होईल?”,” असे सरमा यांनी ‘एक्स’वर लिहिले. सरमा यांनी भौगोलिक आणि जलशास्त्रीय डेटाच्या आधारावर माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, चीन ब्रह्मपुत्रेच्या एकूण प्रवाहापैकी फक्त ३० ते ४० टक्के वाटा देतो, ज्याचा स्रोत मुख्यत्वे हिमनदी वितळणे आणि तिबेटवरील मर्यादित पाऊस आहे. ते म्हणाले की, नदीचे उर्वरित ६५ ते ७० टक्के पाणी भारतात वाहणाऱ्या नदी आणि पावसातून मिळते.

सरमा म्हणाले, ” नदीचे उर्वरित ६५-७०% पाणी भारतात निर्माण होते. हे पाणी नदीला अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड आणि मेघालयातील मुसळधार पावसामुळे, तसेच सुबानसिरी, लोहित, कामेंग, मानस, धनसिरी, जिया-भराली, कोपिली यांसारख्या प्रमुख उपनद्यांमुळे मिळते. खासी, गारो आणि जैंतिया टेकड्यांमधून कृष्णाई, दिगारू आणि कुल्सी यांसारख्या नद्यांमधून पाण्याचा अतिरिक्त प्रवाह वाढतो,” असेही त्यांनी सांगितले.

“भारतात प्रवेश केल्यानंतर ब्रम्हपुत्रा नदीची ताकद वाढते”

भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतरच नदीची ताकद वाढते, असेही सरमा यांनी सांगितले. “भारत-चीन सीमेवर नदीचा प्रवाह २,००० ते ३,००० घनमीटर प्रति सेकंद असतो. परंतु, मान्सूनदरम्यान आसामच्या मैदानी प्रदेशात (उदा. गुवाहाटी) नदीचा प्रवाह १५,००० ते २०,००० घनमीटर प्रति सेकंद वाढतो, ” असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानचा दावा त्यांच्यावरच उलटवला आणि सांगितले की, चीनने नदीच्या पाण्यात कोणतीही कपात केल्यास भारताला आसाममध्ये दरवर्षी येणारा पूर कमी करण्यास मदत होऊ शकेल.”

ते म्हणाले, ” चीनने कधीही या स्वरूपाची धमकी दिली नाही किंवा कोणत्याही अधिकृत व्यासपीठावर अशी घोषणा केली नाही, मात्र जरी चीनने पाण्याचा प्रवाह कमी केला तरी यामुळे प्रत्यक्षात आसाममधील वार्षिक पूर कमी करण्यास भारताला मदत होऊ शकते. आसाममधील या पुरामुळे दरवर्षी लाखो लोक विस्थापित होतात आणि त्यांच्या उपजीविकेचे साधनही नष्ट होते. आता सिंधू जल करारांतर्गत ७४ वर्षांपासून प्राधान्याने पाणी उपलब्ध असलेला पाकिस्तान भारताने आपले सार्वभौम हक्क पुन्हा मिळवल्याने घाबरला आहे,” असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांचा पाकिस्तानला इशारा

भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान सहन केल्यानंतरही, पाकिस्तानने भारतविरोधी वक्तव्य सुरूच ठेवले आहे. भारताने करार स्थगित केला तेव्हा पाकिस्तानच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी भारताला करार पुनर्संचयित न केल्यास युद्ध आणि रक्तपाताची धमकी दिली. चीन ब्रह्मपुत्र नदीचे पाणी रोखू शकते, अशी धमकीही पाकिस्तानने भारताला दिली. परंतु, आता हिमंता बिसवा सरमा यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे आणि भारताला धमकावण्यासाठी चीनचा वापर करू नये असे स्पष्ट सांगितले आहे. त्यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, ब्रह्मपुत्रेच्या पाण्यासाठी भारत चीनवर अवलंबून नाही, कारण ही नदी पावसावर अवलंबून असलेली नदी आहे.