भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर हे त्यांच्या एका नव्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सोशल मीडियावर सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्यांवर बोलताना लोणीकरांनी टीका केली आहे. जालना जिल्ह्यातील परतूर इथे हर घर सोलर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केलेल्या भाषणात लोणीकर बोलत होते.

नेमकं काय म्हणाले बबनराव लोणीकर?

“ते कुचळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे… त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले आहेत. तुझ्या पायातील बूट अथवा चप्पल आमच्यामुळेच आहेत. तुझ्या हातातलं डबडं, तो मोबाइलदेखील आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का? आमचं घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का?

दरम्यान, बबनराव लोणीकर यांनी केलेल्या या टीकेनंतर विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं आहे. शिवसेना (उबाठा) आमदार अंबादास दानवे यांनी ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती असल्याचे म्हटले आहे. तसंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही लोणीकरांच्या निलंबनाची मागणी करत पक्षाने पाऊल न उचलल्यास त्यांना कुठल्याही गावात फिरू देणार नाही असे म्हटले आहे.

बबनराव लोणीकर यांची राजकीय कारकीर्द

बबनराव दत्तात्रय लोणीकर यांचा जन्म १ मार्च १९६५ रोजी झाला. लोणीकरांच्या राजकारणाची सुरुवात पंचायत समितीपासून झाली. पंचायत समितीचे सदस्य आणि सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर ते जिल्हा परिषदेवर निवडून आले. १९९९, २००४ आणि २०१४ मध्ये ते परतूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यांना जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी देण्यात आली. तसंच २०१४ ते २०१९ दरम्यान ते महाराष्ट्र सरकारमध्ये पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री होते. ते महाराष्ट्र विधानसभेत परतूर विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात.
लोणीकरांनी आतापर्यंत पाच विधानसभा निवडणुका लढवल्या, त्यापैकी तीन वेळा ते विजयी झाले.

लोणीकर हे याआधीही अनेकदा टीकेचे धनी ठरले आहेत. सार्वजनिकरित्या बोलताना तसंच कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अनेकदा त्यांनी वादग्रस्त विधानं केली आहेत. मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर मोर्चा काढण्यावरून वादग्रस्त भाष्य केलं होतं. “तुम्हाला वाटलं मोर्चासाठी एखादी हिरोईन आणायची असेल तर हिरोईन आणू, कोणीच नाही भेटलं तर तहसीलदार मॅडम हिरोईन आहेतच”, असं बबनराव लोणीकर म्हणाले होते. लोणीकरांची या विधानाबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली आणि त्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरणही दिलं.

ऑडिओ क्लिपमध्ये लोणीकर म्हणाले होते की, “तहसीलदार मॅडम हिरोईन आहेतच…

सरकारकडून २५ हजार रुपये अनुदान पाहिजे असेल तर मराठवाड्याला सगळ्यात मोठा मोर्चा परतूरला करायचा का हे तु्म्ही ठरवा. सगळ्या सरपंचांनी आपापल्या गावातून गाड्या आणल्या पाहिजेत. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सगळ्यांनी ताकद लावली तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मार्चा इथे होऊ शकतो. अधिवेशनाच्या आधी जर मोर्चा झाला तर २५ हजार लोक आणेन, ५० हजार लोक आणेन. तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीसांना आणू, तुम्ही सांगा चंद्रकांतदादा पाटलांना आणू, तुम्ही सांगा सुधीरभाऊंना आणू, कुणाला आणायचं? तुम्हाला वाटलं एखादी हिरोईन आणायची तर मग हिरोईनही आणू आणि कुणी नाहीच भेटलं तर तहसीलदार मॅडम हिरोईन आहेतच, त्या तुमचं निवेदन घ्यायला येतील.” त्यानंतर विरोधकांनी लोणीकरांवर सडकून टीका केली. “जिजाऊ-सावित्रीच्या लेकी हिरोईन आहेतच, त्यांची काळजी करू नका. पण, तुमच्यासारखा विलन आजूबाजूला असेल तर त्यांचा सुपडा साफ करायला आम्हाला वेळ लागणार नाही”, अशी टीका रूपाली चाकणकर यांनी केली होती.

लोणीकरांची पदवी बनावट?

लोणीकरांच्या पदवीवरूनही वाद झाला होता. त्यांची पदवी बनावट असल्याचे विरोधकांनी म्हटले होते. परतूर इथल्या लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयाच्या केंद्रातून बी ए प्रथम वर्षाची मुक्त विद्यापीठाची परीक्षा दिल्याचे आणि त्याची कागदपत्रेही आपल्याकडे असल्याचे लोणीकर यांनी सांगितले होते. औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयातून त्यांनी दुसऱ्या वर्षाची परीक्षा दिली, मात्र तिथे उत्तीर्ण होऊ शकलो नाही असेही ते म्हणाले होते.

पोलिसाला धमकी

लोणीकर पुन्हा चर्चेत आले होते ते धमकी प्रकरणावरून. त्यांनी परतूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. पी. ठाकरे आणि आयपीएस अधिकारी हसन गौहर यांना फोनवरून धमकावले होते. “आमचे शंभर आमदार आहेत, उद्या विधानसभेत उलटा टांगेन अशा शब्दांत त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना धमकावले होते. याबाबतची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी अवैध दारूचे अड्डे, मटका आणि गुटखा साठवणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली होती.

मराठा समाजाच्या मतांबाबत विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२४ च्या अखेरीसही बबनराव लोणीकर यांनी मराठी समाजाच्या मतांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “मराठा समाजाची मतं कांड्यावर मोजण्याइतकी आहेत. या गावात अठरा पगड जातीचे लोक आहेत. मराठा समाजाची कांड्यावर मोजण्याइतकी मते आहेत. मात्र, हे गाव सर्व समाजाचे गाव आहे, सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत आहेत”, असे लोणीकर म्हणाले होते