नाशिक – शिवसेनेतून (उध्दव ठाकरे) हकालपट्टी झालेले बहुचर्चित सुधाकर बडगुजर आणि विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणारे माजी स्थायी सभापती गणेश गिते यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याच्या हालचालींमागे भाजपच्या स्थानिक आमदारांना अस्थिर करुन त्यांना आपल्याच मतदारसंघात गुरफटून ठेवण्याची खेळी खेळली जात असल्याची भावना पक्षात प्रबळ होत आहे.
विधानसभा निवडणुकीत हॅटट्रिक साधूनही जिल्ह्यातील भाजपचा एकही आमदार मंत्री होऊ शकलेला नाही. त्यांचे पंख छाटून स्थानिक नेतृत्व प्रस्थापित होणार नाही, जिल्ह्याचे नेतृत्व करू शकणार नाही, जेणेकरून बाहेरील प्रभावशाली नेता नाशिकची संपूर्ण धुरा सांभाळेल, असे पक्षांतर्गत राजकारण होत असल्याचा काही जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा दावा आहे.
१९९५ मध्ये तत्कालीन शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये भाजपचे डॉ. डी. एस. आहेर हे आरोग्यमंत्री होते. तेव्हा काँग्रेसमधून भाजपवासी झालेले ए. टी. पवार देखील मंत्री झाले होते. त्यानंतर अडीच दशकात पक्षाने स्थानिक पातळीवर एकालाही संधी दिलेली नाही. त्या काळात भाजपचे तत्कालीन नेते एकनाथ खडसे यांचा संघटनात्मक कामात जोर होता. नाशिकची जबाबदारी त्यांच्याकडे होती. २०१४ नंतर गिरीश महाजन यांच्याकडे ती धुरा आली. तेव्हापासून महाजन म्हणतील ती पूर्वदिशा, अशाप्रकारे पक्षीय कामकाज सुरू असल्याचे दिसून येते.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे यांनी सुधाकर बडगुजर आणि नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपच्या राहुल ढिकलेंनी राष्ट्रवादीचे (शरद पवार) गणेश गितेंना मोठ्या फरकाने पराभूत केले. निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीपासून पैसे वाटपापर्यंत आरोप-प्रत्यारोप झाले. समर्थकांमध्ये संघर्ष झाला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हे दाखल झाले. आता पराभूत, बंडखोरी करणाऱ्यांना भाजपमध्ये सामावून स्वपक्षीय आमदारांना एकप्रकारे डिवचण्याची तयारी होत असल्याचे मानले जाते.
विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्यमधून उमेदवारीसाठी ज्येष्ठ आमदार देवयानी फरांदे यांना बरेच झगडावे लागले होते. आधीच्या भाजप-शिवसेना शिंदे युती सरकारमध्ये फरांदे यांचे नाव मंत्रिपदाच्या स्पर्धेत होते. नंतर राष्ट्रवादी (अजित पवार) सत्तेत भागीदार झाला. आणि त्यांची संधी हिरावली गेली. नंतर विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी त्यांना तिष्ठत ठेवले गेले. या सर्व घटना पाहिल्यास भाजपमध्ये नाशिकच्या लोकप्रतिनिधींचे स्थान नेहमी डळमळीत, दुय्यम ठेवण्यात अधिक स्वारस्य दाखविले जात असल्याकडे लक्ष वेधले जाते.
जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत. सीमा हिरे, देवयानी फरांदे आणि डॉ. राहुल आहेर हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर राहुल ढिकले आणि दिलीप बोरसे यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला. भाजपकडून नाशिकला मंत्रिपद न देण्याचा संबंध कुंभमेळ्याशी जोडला गेला. आगामी कुंभमेेळ्याची जबाबदारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांचीच नाशिकच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली होती. मित्रपक्षांच्या विरोधामुळे हा विषय रखडला. भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधीला मंत्रिपदी संधी दिल्यास बाहेरील नेत्याला जिल्ह्याचे पालकत्व कसे देता येईल, असाही विचार नेतृत्वाकडून झाल्याची शक्यता काही जण बोलून दाखवतात. स्थानिक नेतृत्व खुरटे राखण्यात पक्षाची नेमकी काय व्यूहरचना आहे, असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना सतावत आहे.