महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष जयंत पाटील यांनी एका वर्षात दुसऱ्यांदा आपल्या पदाचा राजीनामा देण्याची ऑफर पक्षाला दिली आहे. पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी नवीन चेहऱ्यांना दिली जावी यासाठी राजीनामा देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले आहे. जयंत पाटील यांनी दुसऱ्यांदा राजीनामा देण्याबाबत विधान केल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. मंगळवारी पक्षाच्या २६ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. जयंत पाटील यांनी केलेल्या मागणीवर शरद पवार यांनी त्यांच्या भाषणातच उत्तर दिले. पवार म्हणाले की, “जयंत पाटील यांनी दहा वर्षे राज्याचे अर्थमंत्री म्हणून काम केले. विरोधी पक्ष म्हणूनही त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या पाटील यांच्या मागणीनुसार प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर निर्णय घेतला जाईल. प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात एक नवीन चेहरा पक्षाचे नेतृत्व करेल याची खात्री आम्हाला करायची आहे.”

शरद पवार यांनी बोलताना पाटील यांना त्यांच्या पदावर राहण्याचा आग्रह धरला नाही आणि त्यांच्या नेतृत्वाचे कौतुकही केले नाही. पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या (शरद पवार) नेत्यांच्या एका गटाला असे वाटू लागले आहे की, जर पाटील यांनी राजीनामा दिला तर ते पक्षात राहणार नाहीत. “त्यांच्यासाठी (जयंत पाटील) भाजपाचे दरवाजे खुले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पाटील यांचे वारंवार केलेले कौतुक हे याचे पुरावे आहेत. ते भाजपा किंवा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत सामील होऊ शकतात”, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

  • जयंत पाटील यांचा राजकीय प्रवास
  • विधानसभा सदस्य (१९९०, १९९५, १९९, २००४, २००९, २०१४)
  • अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य (१९९९-२००८)
  • गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य (२००८-२००९)
  • ग्रामविकासमंत्री, महाराष्ट्र राज्य (२००९-२०१४)
  • महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

असं असताना शरद पवारांचे जवळचे मानले जाणारे ज्येष्ठ राष्ट्रवादी नेते अंकुश काकडे यांनी दावा केला की, “तात्काळ नेतृत्वाची कसलीही चिंता नाही.” “मला वाटते की येत्या महानगरपालिका निवडणुकीपर्यंत पाटील नेतृत्व करतील”, असेही ते म्हणाले. दरम्यान, पवारांच्या घोषणेमुळे त्यांच्याच पक्षातील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे आणि शशिकांत शिंदे, लोकसभा खासदार अमोल कोल्हे आणि पवारांचे नातू रोहित पवार यांसारखे तरुण नेते पाटील यांच्या जागी येण्याच्या शर्यतीत असल्याचे दिसून येत आहे.

पदासाठीचे प्रमुख दावेदार

रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील संबंध तणावग्रस्त आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये पक्षाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात पक्षाच्या कामकाजाशी संबंधित मुद्द्यांवरून पाटील यांना लक्ष्य करणारे रोहित पवार हे पहिले नेते होते. रोहित पवारांनी सार्वजनिकरित्या असे मुद्दे उपस्थित केल्याबद्दल त्यांना फटकारताना पाटील यांनी नंतर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, ते फक्त विधानसभा निवडणुकीपर्यंत या पदावर राहतील. दरम्यान, रोहित यांनी तेव्हा आपला पक्षाचे नेतृत्व करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे सांगितले आणि त्यानंतर त्यांनी जयंत पाटील यांच्या कामाची प्रशंसाही केली होती.

जयंत पाटील यांच्याविरुद्ध विरोधक फार आक्रमक नसले तरी राजीनाम्यामागे एक प्रमुख कारण असल्याचे सूत्रांनी सांगितले. जयंत पाटील यांनी पद सोडण्याची तयारी दाखवण्यामागील कारण म्हणजे त्यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून दाखल असलेले खटले. आयएफ अँड एफएस घोटाळ्यातील कथित सहभागाबद्दलच्या प्रकरणासंदर्भात २०२३ मध्ये ईडीने पाटील यांना समन्स बजावल्यापासून आयएफ अँड एफएस प्रकरण पुढे सरकलेले नाही. भाजपामधील सूत्रांनी सांगितले की, “फडणवीस यांच्याशी पाटील यांचे मैत्रीपूर्ण संबंध त्यांच्या फायद्याचे ठरले आहेत.”

दुसरीकडे, जितेंद्र आव्हाड हे शरद पवार तसेच त्यांच्या कन्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय आहेत. विविध मुद्द्यांवर सत्ताधारी महायुतीला जोरदारपणे तोंड देणारा एक मजबूत आवाज म्हणून आव्हांडाकडे पाहिले जाते. तसंच ओबीसी नेते मस्साजोगचे सरपंच संजय देशमुख यांच्या हत्येवरून माजी मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या समर्थकांवर केलेल्या हल्ल्यांमुळे मराठा समाजात त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले असल्याचे बोलले जाते.

Sharad Pawar regretted youth shifting from cooperatives to private manufacturing despite West Maharashtras legacy
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार

पाटील यांच्या जागी शशिकांत शिंदे हेदेखील आणखी एक आघाडीचे उमेदवार आहेत. ते सातारा जिल्ह्यातून अनेक वेळा आमदार राहिले आहेत. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उदयनराजे भोसले यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. जालन्याचे रहिवासी असलेले आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याचे आरोग्य मंत्री म्हणून कोविड-१९ साथीच्या आजाराबाबत त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक झाले होते.

सुप्रिया सुळे शर्यतीत आहेत का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूत्रांनी सांगितले की, जर शरद पवारांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला तरच सुप्रिया सुळे राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रवादी (शरद पवार)ची सूत्रे हाती घेण्यास उत्सुक होत्या. तरीही पक्षातील एका गटाला असे वाटते की, त्यांनी पाटील यांचा पदभार स्वीकारावा. “पवार साहेब आमचे राष्ट्रीय नेते आहेत आणि सुप्रिया सुळे यांनी पक्षासाठी महत्त्वाचे राज्य असलेल्या महाराष्ट्राची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्या एक सक्षम नेत्या आहेत, ज्यांनी आपली क्षमता वेळोवेळी सिद्ध केली आहे. अलीकडेच त्यांनी परदेशात केंद्र सरकारने पाठवलेल्या शिष्टमंडळात देशाचे प्रतिनिधित्वदेखील केले आणि प्रशंसा मिळवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील त्यांच्यावर विश्वास ठेवला”, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते महेश तपासे यांनी म्हटले