scorecardresearch

माजी मुख्यमंत्रीच असुरक्षित पोलिसात तक्रार

अशोक चव्हाण यांना ‘वाय’ दर्जाची साधी सुरक्षा व्यवस्था आहे. पोलीस प्रशासनाला त्यांनी दिलेल्या तक्रारीत घातपात घडण्याची भीती व्यक्त केल्यामुळे हे प्रकरण गंभीर झाल्याचे मानले जात आहे.

Ex-Chief Minister, Ashok Chavhan, police complaint, unsafe
माजी मुख्यमंत्रीच असुरक्षित पोलिसात तक्रार

संजीव कुलकर्णी

आपल्या विरोधात घातपात घडविण्याचे कारस्थान रचले जात असल्याची तक्रारच राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय गृहमंत्र्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी पोलिसांमध्ये केल्याने माजी मुख्यमंत्रीच सुरक्षित नाहीत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

प्रदीर्घ काळ अव्वल व कडेकोट सुरक्षा व्यवस्था अनुभवलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या बाबतीत घातपात घडविण्याचे कारस्थान दिसून येत असल्याची लेखी तक्रार नांदेड पोलीस प्रशासनाकडे सोमवारी केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मंत्रिपदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून आपल्या नावाने बनावट पत्रे तयार केली जात असल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा…. दोन महिन्यांत मुख्यमंत्र्यांचे कोकणात चार दौरे, ठाकरे गटाला खिंडार पाडण्यात मात्र अपयशी

अशोक चव्हाण गेल्या तीन दिवसांपासून नांदेड मुक्कामी असून सोमवारी दुपारी ते धर्माबादजवळील एका जाहीर कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यापूर्वी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार पांडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी तक्रार नोंदविली. स्वतःच्या बाबतीतील एखाद्या प्रकरणात पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन तक्रार नोंदविण्याचा प्रसंग चव्हाण यांच्यावर प्रथमच ओढवला. त्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा… कसब्यातील संपर्कासाठी भाजपचा राज्यभर धुंडाळा

विद्यमान सरकार सत्तेत येण्यापूर्वी अशोक चव्हाण हे महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या लेटरहेडचा गैरवापर करून बनावट पत्रे तयार केली असल्याची बाब चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर अशाच एका बनावट लेटरहेडवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले एक बनावट पत्र आढळून आल्यानंतर चव्हाण यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांची प्रत्यक्ष भेट घेत लेखी तक्रार दिल्यानंतर येथे खळबळ उडाली.

हेही वाचा… सोलापुरमध्ये भाजपकडून पर्यायी नेतृत्वाची चाचपणी ?

याच तक्रारीत चव्हाण यांनी मुंबई आणि नांदेडमध्ये आपल्यावर खाजगी व भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जात आहे. तसेच सदरहू व्यक्ती पाठलाग करून आपल्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याचे दिसून आले. त्यावरून आपला घातपात घडविण्याचे कारस्थान असल्याची शंका व्यक्त केल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य ठळक झाले आहे.

हेही वाचा…. Maharashtra News Live: “शिवधनुष्य रावणाला देखील पेलवले गेले नाही, ते मिंधे गटाला कसे पेलवणार?” उद्धव ठाकरेंचा सवाल

अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री असताना झेड+ दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती. त्याआधी शंकरराव चव्हाण यांच्या केंद्रीय गृहमंत्रिपदाच्या काळातही चव्हाण कुटुंबाने उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था अनुभवली होती. अलीकडच्या काळात पोलीस प्रशासनाने त्यांना वाय+ सुरक्षेसह एस्कॉर्ट व्यवस्थाही उपलब्ध करून दिली होती. आता चव्हाण यांना ‘वाय’ दर्जाची साधी सुरक्षा व्यवस्था आहे. पोलीस प्रशासनाला त्यांनी दिलेल्या तक्रारीत घातपात घडण्याची भीती व्यक्त केल्यामुळे हे प्रकरण गंभीर झाल्याचे मानले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 16:58 IST