सातारा: राज्याचे मोठे पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने महाबळेश्वर महा पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.परंतु मंत्र्यांची ,प्रशासकीय अधिकाऱ्यांची गर्दी,मोठा पोलीस बंदोबस्त,पर्यटकांनी फिरवलेली पाठ,नेहमीची वाहतूक कोंडी मुळे हा महामहोत्सव पर्यटक मुक्त महोत्सव ठरला.

मागील महिनाभर मोठा गाजावाजा करून या महा पर्यटन महोत्सवाची जोरदार तयारी केली होती. वेण्णा लेक फेस्टिवल,संगीत, मनोरंजनाच्या कार्यक्रमासह भव्य सांस्कृतिक कार्यक्रम, मंदिर दर्शन, लेझर आणि ड्रोन शो, किल्ले आणि शस्त्र प्रदर्शनी,महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती, स्वरोत्सव अशा अनेक भरगच्च कार्यक्रमांचे विविध उपक्रम राबवण्यात आले होते . आकर्षक टेन्ट सिटीचीही उभारणी करण्यात आली होती.परंतु, सहभागी होण्यासाठी आलेल्या पर्यटकांना त्याचा मनस्वी आनंद घेता आला नाही . बचत गटाचे खाद्य स्टॉल मात्र एकदम आकर्षक होते आणि तेथेच गर्दी जाणवली.रविवारी दुपारी अचानक हेलिकॉप्टरच्या फेऱ्या तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आल्या. मंत्री बंदोबस्त यामुळे पर्यटकांच्या फिरण्यावर अडथळ्याची शर्यतच ठरली. सर्वत्र वाहतूक कोंडी झाली. मंत्री व अधिकारी आणि त्यांच्या सोबत आलेल्या लवाजम्याचे स्वागत व पाहुणचारासाठी कमी पडू नये. यासाठी पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. स्थानिक पातळीवर नियोजन करण्या ऐवजी मोठ्या एजन्सीला ठेका दिल्यामुळे मराठी मातीत चाललेला हा महोत्सव कुठेतरी पर प्रांतात असल्याचा भास निर्माण झाला.

पर्यटन महोत्सवाला रस्ते दुरुस्तीचा मोठा अडथळा होता. पुणे बंगळूर महामार्गापासून महाबळेश्वर तीस किलोमीटर अंतर असताना पर्यटकांना मोठा वळसा घालून महामार्गावर यावे लागले. रस्ते बंदची चर्चा पर्यटकांमध्ये झाल्याने पर्यटक फिरकले नाहीत. पोलीस बंदोबस्ताचा मोठा फटका पर्यटन महोत्सवाला बसला.

महापर्यटनाचा नेमका उद्देश स्थानिकांच्या पर्यटनाला, व्यवसायाला चालना देण्याचा असताना स्थानिकांचा सहभाग या महापर्यटन महोत्सवात किती हा एक संशोधनाचा विषय आहे. महाबळेश्वरच्या पर्यटन हंगामात पर्यटकांना आकर्षित करुन घेतले जात असते. विविध कार्यक्रमात स्थानिकांना सामावून न घेता एका खाजगी कपंनीला महापर्यटन महोत्सवाचा ठेका दिला गेला .

व्यावसायिकांनाही या महोत्सवाचा मोठा फायदा झाला नाही. या महोत्सवात संपूर्ण जिल्हा प्रशासनाला राबविले गेले. सभा व कार्यक्रमाच्या मंडपात पर्यटक स्थानिकांपेक्षा प्रशासकीय अधिकाऱ्यांची गर्दी जास्त होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उद्घाटनाच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समारोपाच्या कार्यक्रमाने महोत्सवात जिवंतपणा आणला. मुख्यमंत्र्यांनीच पर्यटन विभागाच्या कामकाजातील त्रुटी दाखविल्या. राज्यात आज अनेक छोटी मोठी पर्यटन स्थळे, पाच जागतिक वारसा स्थळे, व्याघ्र प्रकल्प, प्रेक्षणीय गड किल्ले, साडेसातशे किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा, मोठी लोक,ग्राम आणि खाद्य संस्कृती,गणपती उत्सव, गणपती विसर्जन मिरवणूक, पंढरीची वारी, आषाढी एकादशी, राज्यात होणारे उत्सव, महोत्सव,मोठ्या जत्रा तेथील संस्कृती अशा अनेक बाबींचा वापर आपण पर्यटनासाठी उपयोग करण्याचा व पर्यटनातून रोजगार उपलब्ध करण्याचा डोस या विभागाला दिला. देशाच्या पर्यटनाच्या नकाशावर आपण पाचव्या क्रमांकावर आहोत. मात्र यापुढे पर्यटन स्थळांचा पुरेपूर वापर करून आपण पहिल्या क्रमांकाला आले पाहिजे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

पर्यटन महोत्सव निश्चित आयोजित करा. पण ते एककल्ली असू नयेत असेही त्यांनी सुनावले.पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा प्रशासनाच्या मदतीने मागील दोन महिन्यांपासून खूप कष्ट घेतले.मात्र स्थानिक लोकप्रतिनिधीं माध्यम प्रतिनिधी स्थानिकांशी समन्वय ठेवता आला नाही. त्यामुळेही पर्यटक मुक्त महोत्सव झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पर्यटन महोत्सवातून पाचगणी आणि क्षेत्र महाबळेश्वरला वगळण्यात आले होते. त्यामुळे या महोत्सवाच्या नियोजनाच्या हेतू बाबतही स्थानिकांडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. खासदार उदयनराजे,उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महोत्सवाकडे पाठच फिरवली. तर स्थानिक आमदार व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा मुख्यमंत्र्यांबरोबरच्या उपस्थितीशिवाय कोठेही सहभाग दिसून आला नाही. त्यामुळे या कार्यक्रमापासून स्थानिक दूरच होते. या महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला. याची दखल मुख्यमंत्री, मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही घेतली. या महोत्सवामुळे राज्याच्या पर्यटनाला असा नेमका किती फायदा झाला,याचा लेखाजोखा मात्र होणे गरजेचे आहे.