छत्रपती संभाजीनगर : हॉटेल व्हिट्स व्यवहारातून अंग काढून घेतल्यानंतर समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत व पत्नी विजया यांच्या ‘ कॅमिओ’ या आसवानी ( रेक्टिफाईड स्पिरिट उत्पादन – डिस्टलरी ) प्रकल्पास शेंद्रा औद्योगिक विकास मंडळातील २१ हजार २७५ चौरस मीटर म्हणजे पाच एकर जमिनीचे आरक्षण बदलविण्यात आले. ही जागा पूर्वी मालमोटार थांब्यासाठी ( ट्रक टर्मिनल्स ) आरक्षित होती. मात्र, या कंपनीस जागा देण्यासाठी संगनमताने शासकीय कागदपत्रे फिरविण्यात आली. यामध्ये तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत यांचाही हात होता, असा आरोप माजी खासदार इत्मियाज जलील यांनी केला. करत असलेल्या आरोपाच्या पुष्ठ्यार्थ त्यांनी पत्रकारांसमोर कागदपत्रेही दाखवली. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून केंद्रीय गुन्हा अन्वेषण, सक्त वसुली संचालनालय यांच्यासह कोणत्याही यंत्रणेव्दारे तपास करावा, अशी मागणी केली. या अनुषंगाने आपणही लेखी तक्रार करणार असल्याचे जलील म्हणाले.

शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील मालमोटारीच्या थांब्यासाठी दोन भूखंड आरक्षित करण्यात आले होते. एका भूखंडावर २०० ते २५० तर दुसऱ्या भूखंडावर ७० ते ८० गाड्या उभ्या राहतील असे ठरविण्यात आले होते. हे भूखंड हवे आहेत असा अर्ज सिद्धांत शिरसाट यांनी केला. त्यानंतर ३ जून २०२२ महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांनी या भूखंडाचे आरक्षण काढून टाकण्याचा प्रस्ताव दिला आणि २४ ऑगस्ट २०२३ रोजी आरक्षण रद्द करण्यात आले. जेवढेच आरक्षण क्षेत्र रद्द करण्यात आले तेवढेच म्हणजे २१ हजार २७५ चौरस मीटरची जागा कॅनिओ आसवानी प्रकल्पास देण्यात आली. याचा अर्थ जागा शिरसाट यांच्या मुलाला द्यायची असल्यानेच ते आरक्षण उठविण्यात आले, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. आरक्षण उठविण्याची ही प्रक्रिया कमालीची वेगात घडली. शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये इतर उद्योजकांना एक इंचही जमीन नाही, असे वारंवार सांगितले जात असताना केवळ शिरसाट यांच्या मुलास जमीन देण्यासाठी अधिकाऱ्यांनी खेळ मांडला असल्याचाही जलील यांचा आरोप आहे.

या कंपनीचे संचालक म्हणून मंत्री शिरसाट यांचे पूत्र सिद्धांत, पत्नी विजया आणि भावेन आमिन हे संचालक होते. पण जेव्हा जमीन कंपनीला वितरित करण्यात आली त्यानंतर या कंपनीतून भावेन आमिन यांनी राजीनामा दिला. ‘ कॅमिओ’चे भागभांडवल १०५ काेटी ८९ लाख रुपयांचे आहे. ही कंपनी स्थापना करण्यासाठी शिरसाट यांच्या पत्नी आणि मुलाचे स्वभांडवल २६ कोटी ४७ लाख रुपयांचे असल्याचे कंपनीच्या कागदपत्रात नमूद असून ७९ कोटी ४२ लाख रुपयांचे कर्ज बँकेने दिले आहे. एखाद्या गृहणी असणाऱ्या महिलेस एवढे कर्ज कसे दिले गेले, स्वभांडवल नक्की कोणत्या स्रोतातून आणले गेले, याची उत्तरे समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी द्यावीत, असे इम्तियाज जलील म्हणााले. संजय शिरसाट यांच्या २०२४ मधील विधानसभा निवडणूक शपथपत्रातही ‘कॅमिओ’ आसवानीचा उल्लेख आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती लेखी स्वरुपात मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेच. या शिवाय अन्य संबंधित संस्थांकडेही याची तक्रार करणार असल्याचे जलील म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“या आरोपांना उत्तर काय देणार, कोणीही काहीही आरोप करेल. त्यावर उत्तर देऊन मी माझी उर्जा कशाला खर्ची घालू. या प्रकरणात सर्व बाबी कायद्यान्वये झाल्या आहेत. पण यावर मला उत्तरच द्यायचे नाही. या आरोपांमध्ये काही तथ्य नाही.” – संजय शिरसाट, मंत्री समाज कल्याण</p>