नितीन पखाले

यवतमाळ– पुसदचे नाईक घराणे म्हणजे वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांचा समृद्ध सामाजिक, राजकीय वारसा लाभलेले कुटुंब. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजतागायत नाईक घराणे राजकारणात सक्रिय आहे. महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री या कुटुंबाने दिले. बंजारा समाजाचे दैवत असलेल्या नाईक कुटुंबात राजकीय महत्वाकांक्षेपोटी अलिकडे मात्र फूट पडल्याचे चित्र आहे.

वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, अविनाश नाईक, मनोहरराव नाईक, ॲड. नीलय नाईक, आ. इंद्रनील नाईक, ययाती नाईक ही प्रत्येक व्यक्ती राजकारणात सक्रिय राहिली आहे. सुधाकरराव नाईक यांच्यानंतर मनोहरराव नाईक यांनी या कुटुंबाचा राजकीय वारसा भक्कमपणे सांभाळला. आता नीलय नाईक, इंद्रनील नाईक व ययाती नाईक हे राजकीय परंपरा सांभाळत आहे. नाईक कुटुंब मूळ काँग्रेस विचारधारेचे. मात्र काँग्रेस फुटल्यानंतर सुधाकरराव नाईक यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना साथ दिली. तेव्हापासून हे कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. मात्र कुटुंबातील नीलय नाईक हे सध्या भाजपसोबत आहेत, आणि ते भाजपचे विधान परिषदेचे आमदारसुद्धा आहेत. मनोहर नाईक यांचे धाकटे चिरंजीव इंद्रनील नाईक हे आमदार असून आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहे.

हेही वाचा >>> Lok Sabha Election 2024 : उमेदवारीवरून मराठवाड्यातील चार मतदारसंघात ‘ गोंधळात गोंधळ’

बंजारा समाजात नाईक कुटुंबाला दैवतासमान स्थान आहे. बंगल्यावरून निघालेला आदेश हा बंजारा समाजासाठी प्रमाण असायचा. अलिकडे जिल्ह्यात संजय राठोड यांच्या रूपाने बंजारा समाजाचे नवे शक्तीकेंद्र निर्माण झाले. संजय राठोड यांनी बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीच्या विकासाला चालना देवून, बंजारा समाज आपल्याकडे खेचला. देशभरात दौरे करून बंजारा समाजाची मोट बांधली. त्यामुळे सहाजिकच बंजारा समाजाचे नेते म्हणून संजय राठोड पुढे आले. या काळात मनोहरराव नाईक यांची समाजावरची पकड कमी झाल्याची खंत समजाबांधवसुद्धा व्यक्त करतात.

गेल्या विधानसभा निवडणुकीत मनोहरराव नाईक यांनी प्रकृतीच्या कारणाने विधानसभा निवडणूक न लढविता, धाकटा मुलगा इंद्रनील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली व निवडून आणले. अलिकडे राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर आमदार इंद्रनील नाईक हे अजित पवार गटात सहभागी झाले. मनोहरराव नाईकांनी ते नेमके कोणाच्या बाजूने आहेत, हे गुपित मात्र अद्यापही उघड केले नाही. तर मनोहर नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव ययाती नाईक हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिले आहेत. ययाती नाईकांनी मात्र या लोकसभा निवडणुकीत आपली वेगळी चूल मांडली आहे. आमदार असलेला धाकटा भाऊ महायुतीसोबत असताना, ययाती नाईक यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीला पाठींबा दिला आहे. महाविकास आघाडीचे येथील उमेदवार संजय देशमुख यांना निवडून आणण्यासाठी बंजारा बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहनच ययाती नाईक यांनी केल्याने नाईक कुटुंबात राजकीय दरी निर्माण झाल्याची चर्चा आहे. आपण संजय देशमुख यांना वैयक्तिक संबंधामुळे पाठींबा दिला असून, अद्याप कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नसल्याचे ययाती नाईक यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>> Lok Sabha Election 2024 : रामटेकमध्ये केदार यांची कोंडी करण्याचे महायुतीचे प्रयत्न

महाविकास आघाडीनेही या संधीचे सोने करत घरातच राजकीय उपेक्षा वाट्याला आलेल्या ययाती नाईक यांना आपल्या मंचावर मानाचे स्थान दिले आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस (शदर पवार) गटाचे नेते रोहित पवार यांच्या बरोबरीने ययाती नाईक यांचेही छायाचित्र फलकांवर झळकले आहे. ययाती नाईक यांची राजकीय कारकीर्द फारशी दमदार नसली तरी, दोन युवा नेत्यांच्या सोबतीने महाविकास आघाडीत त्यांना स्थान मिळाल्याने ते बंजारा मतदारांवर किती प्रभाव पाडू शकतात, हे येत्या काळात दिसणारच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकाच कुटुंबात सर्व पक्ष

कधीकाळी काँग्रेस व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससोबत निष्ठा जोपसणाऱ्या नाईक कुटुंबात आता महाविकास आघाडी आणि महायुती शिरल्याचे दिसत आहे. कुटुंबातील व्यक्ती वेगवेगळ्या पक्षांशी निष्ठा ठेवून असल्याने ही भविष्यातील राजकीय सोय तर नाही ना, अशीही चर्चा आहे. महायुतीचे सरकार आले तर महायुतीला पाठींबा देणारा आमदार मुलगा व पुतण्या घरात आहे, आणि महाविकास आघाडीने बाजी मारली तर, घरातील एका मुलाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणले, असे म्हणण्यास वाव आहे