सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगर : राजकीय व्यासपीठांवर येणारी वा आणली जाणारी प्रतीके आता बदलू लागली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सभेत भारतमातेच्या छायाचित्रासमोर ‘भारतीय संविधाना’ची प्रत ठेवून अभिवादन करण्यात आले. त्याच वेळी सत्ताधारी भाजपच्या वतीने आयोजित सावरकर गौरव यात्रेची सुरुवात वेदशाळेतील विद्यार्थ्यांच्या शांतिपाठाने झाली. निवडणुकांपूर्वी ‘विचार प्रवाह’ आणि प्रतीके यातूनही ध्रुवीकरणाची समीकरणे नव्याने मांडली जात आहेत.

डरकाळी फोडणारा वाघ हे शिवसेनेच्या व्यासपीठावर ठसठशीतपणे दिसणारे चित्र असे. पक्षाच्या व्यासपीठावर पूर्वीच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हापेक्षाही वाघ जरा मोठा असे. आता ती जागा ‘मशाली’ने घेतली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या सभेत धगधगती ‘मशाल’ घेऊन एक शिवसैनिक थांबला होता. महाविकास आघाडीच्या सभेत ‘भारतमाते’ चे चित्र होते. पण त्यामागे अखंड हिंदुस्थानाचा नकाशा मात्र नव्हता. ‘भारतमाते’च्या चित्रासमोर भारतीय संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. व्यासपीठावर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेबरोबर महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. ‘संभाजीनगर’ मधील शिवसैनिकांच्या नजरेत या प्रतीकांची नवलाई होती. मोजकेच मुस्लिम चेहरेही सभेत दिसत होते. एरवी शिवसेनेच्या सभेत सर्वत्र दिसणारा भगवा रंग होताच, पण त्यामध्ये तिरंग्यावरील पंजा आणि राष्ट्रवादीचे घड्याळ नजरेत भरणारे होते. शहरातील दुध डेअरी चौकातील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादीच्या घड्याळाचे चिन्ह असलेल्या झेंड्यांनी वेढले होते. राजकीय प्रतीकांची अशी मांडामांड एका बाजूला सुरू असताना राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे राजकीय पटलावर ‘सावरकर’ हाच आमचा विचारप्रवाह आहे, असे सांगण्यासाठी आयोजित सावरकर यात्रेची सुरुवात वेदशाळेतील विद्यार्थ्यांच्या ‘शांतिपठना’ने झाली. छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागातील हिंसाचारातील घटनेनंतर ‘शांतीपठण’ महत्त्वपूर्णच. ‘वेदोक्त’- ‘शास्त्रोक्त’ असा वादही तेव्हाच व्हावा, हा योगायोग असल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा… गडचिरोलीत उमेदवारीवरून आतापासूनच कुरघोड्या सुरू

प्रतीके कोणाची कोणती, असे संदेश देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरची भूमी पद्धतशीरपणे वापरली जाते. याचे उदाहरण अगदी दहा महिन्यांपूर्वी ‘ एमआयएम’नेही घालून दिलेले. एका शैक्षणिक संस्थेच्या भूमिपूजनासाठी आलेले अकबरोद्दीन ओवेसी खुलताबाद येथे गेले. त्यांच्याबरोबर खासदार इम्तियाज जलीलही होते. हे दोघे नेते मंडळी ‘औरंगजेबा’च्या थडग्यासमोर नतमस्तक झाले. यापूर्वी आलमगीराच्या या भूमीमध्ये ‘सुकून’ आहे असे सांगत ओवेसी यांनीही त्यांच्या बाजूला आपल्या मृत्यूनंतर ‘दो गज’ जमीन मिळावी, असे भावनिक आवाहन केले होते. ‘आलमगीर’ औरंगजेब हे राजकीय पटलावर आवर्जून आणले जातात. छत्रपती संभाजीनगर असे नामकरण केल्यानंतरही आंदोलनात ‘औरंगजेब’चे छायाचित्र आवर्जून लावणारे कार्यकर्तेही प्रतीकांची मांडामांड करू पाहत होते. पूर्वी भाषणांमधून होणारा ‘हिरवा साप’ असा विखारी उल्लेख आता सेनेच्या व्यासपीठावरुन होईनासा झाला आहे. ध्रुवीकरणाची काही प्रतीके आता बदलू लागली आहेत. पण ध्रुवीकरणाला मात्र वेग दिला जात आहे.

हेही वाचा… कर्नाटक आम्हीच जिंकू! काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जु खरगे यांना विश्वास

सावरकर गौरव यात्रेत ‘ प्रभो शिवाजी राजा’ हे गाणे आवर्जून लावण्यात आले होते. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सांगणाऱ्या काही ध्वनीचित्रफितीही आवर्जून यात्रे दरम्यान कार्यकर्त्यांसमोर आवर्जून पुन्हा बिंबविल्या जात आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New symbols at public rally of maha vikas aghadi for polarization politics print politics news asj
First published on: 04-04-2023 at 10:54 IST