सुहास सरदेशमुख
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मनोज जरांगे-पाटील यांच्या भूमिकेपेक्षा थोडीही विरोधी भूमिका घेणाऱ्या नेत्यांना व त्यांच्या समर्थकांना रोषास सामोरे जावे लागेल, असा संदेश गेल्या दोन दिवसांतील घटनांमुळे मिळाल्याने सर्वपक्षीय नेत्यांची कोंडी झाली. या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी आणि आरक्षण समर्थनाची भूमिका व्यक्त करण्यासाठीसुद्धा गावात जाता येत नसल्याने मुंबई आणि दिल्लीतच उपोषण करण्यापासून ते राजीनामे देण्यापर्यंतची पावले उचलली जात आहेत. आंदोलनात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी लक्ष्य झाले आहेत. आंदोलक घेराव घालण्यापासून राजीनाम्याची मागणी करीत असल्याने खासदार-आमदारांची कोंडी झाली आहे. धड मतदारसंघात फिरता येत नाही. काही जणांनी घरातच बसणे पसंत केले. तर काही लोकप्रतिनिधींनी दिल्ली वा मुंबई गाठली आहे.
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला. वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनीही राजीनाम्याची घोषणा केली. आमदार राजू नवघरे मुंबईत उपोषणाला बसले आहेत. ज्या घरांच्या नेत्यांवर दगडफेक झाली अथवा जाळपोळ झाली, त्यांनी अधिक काही न बोलणे पसंत केले आहे. आरक्षण मागणीसाठी राजकीय नेत्यांना गावात येण्यापासून बंदी करावी, हा निर्णय अंमलबजावणीत आणण्यासाठी गावोगावी तरुणांना शपथ देण्यात आली. अनेक गावांच्या प्रवेशद्वारावर गावबंदीचे फलक लावण्यात आले. मात्र, त्यानंतरही आपणास कोणीही अडवणार नाही असे वाटणाऱ्या मोठ्या नेत्यांनाही आंदोलकांनी रोखले. उपमुख्यमंत्री अजित पवारांपासून ते गावातील आमदारांनाही रोखण्यासाठी त्यांच्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. तत्पूर्वी उपोषणाच्या पहिल्या दिवशी जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या शरद पवार यांच्या विरोधातही घोषणाबाजी झाली होती. पुढे ओबीसीचे नेते अशी प्रतिमा असणाऱ्या छगन भुजबळ यांच्यावर जरांगे-पाटील यांनी टीका केली होती. काँग्रेसचे नेते अमित देशमुख, अशोक चव्हाण यांनाही रोषाचा सामना करावा लागला. राज्य परिवहन मंडळाच्या बसला लक्ष्य करण्यात आले. उद्धव ठाकरे गटाचे नेते जयप्रकाश मुंदडा यांच्या घरावर दगडफेक झाली. प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावण्यात आली. आमदार संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या घरालाही पेटवून देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय जाळण्यात आले आणि बस स्थानकात उभ्या असणाऱ्या ७५ हून अधिक बसगाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. या हिंसक घटनांचा आणि उपोषण आंदोलनाचा संबंध नाही. अशी हिंसा करणारे मराठा कार्यकर्ते आपले नाही, असे जरांगे-पाटील यांनी जाहीर केले.
हेही वाचा… आदिवासींसाठी भाजपची जनजाती सुरक्षा मंचआडून रणनीती
आरक्षणप्रश्नी पक्षीय भूमिका उपयोगी पडणार नाही, असे लक्षात आल्यानंतर नेते आता व्यक्तिगत पातळीवर मराठा समाजाची सहानुभूती असावी म्हणून व आरक्षण मागणीचा पाठपुरावा करत राजीनामा देत आहेत. आंदोलनाचे रूप आणि स्वरूप सत्तेतील भाजपची कोंडी करणारी असावी, अशीच रचना दिसून येत आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्यास त्याला विरोध असेल, असे ओबीसी संघटनांच्या नेत्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला तर तो भाजपला अडचणीत आणणारा ठरू शकेल, असे मानले जात आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीतही आरक्षण मागणीच्या कोंडीतून सर्वपक्षीय नेत्यांची सुटका होण्याची शक्यता कमीच असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा… अलिबाग विधानसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा? शिंदे गटावर कुरघोडीचा प्रयत्न
दिवाळीला काही दिवस शिल्लक असताना व्यापारी मात्र आता हवालदिल झाले आहेत. घडणाऱ्या हिंसक घटनांमुळे उलाढालींवर परिणाम होईल काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.