Loksabha Election 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी (८ एप्रिल) तेलंगणामध्ये प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेत मोदींनी राहुल गांधी यांच्यावर अनेक आरोप केले. मोदींनी पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या आपल्या भाषणात अदानी आणि अंबानींचा उल्लेख केला. लोकसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून राहुल गांधींनी अदानी-अंबानी यांना शिव्या देणे बंद केले आहे. निवडणुकीसाठी अदानी-अंबानींकडून त्यांनी किती माल उचलला आहे, हे जनतेला सांगावे, यांसारखे खळबळजनक आरोप त्यांनी राहुल गांधींवर केले. परंतु, राहुल गांधींचे अदानी-अंबानींबाबत मौन असल्याचा मोदींनी केलेला दावा राहुल गांधींच्या अलीकडील भाषणांशी जुळत नाही. अलीकडे राहुल गांधींनी प्रचारसभेत केलेल्या भाषणांचा संदर्भ पाहिल्यास, असे लक्षात येते की, राहुल गांधींनी आपल्या प्रत्येक भाषणात अदानी-अंबानींचा उल्लेख केला आहे.

प्रत्येक प्रचारसभेत अदानी-अंबानींचा उल्लेख

-७ मे, झारखंड : ७ मे रोजीच्या झारखंड येथील प्रचारसभेत राहुल गांधी म्हणाले, “भाजपा तुम्हाला वनवासी म्हणते आणि सर्व जंगलांची जमीन अदानींना देते. अदानींना सातत्याने जंगलांच्या जमिनी दिल्या जात आहेत. मोदी जे काही करतात, ते अब्जाधीशांसाठी करतात. त्यांचे अदानी व अंबानी यांच्यासारखे २२ ते २५ मित्र आहेत आणि जे काही काम केले जात आहे, ते फक्त त्यांच्यासाठी आहे. जमीन त्यांच्यासाठी आहे, जंगल त्यांच्यासाठी आहे, माध्यम त्यांचे आहे, पायाभूत सुविधा त्यांच्या आहेत, उड्डाणपूल त्यांचे आहेत, पेट्रोल त्यांचे आहे. सर्व काही त्यांच्यासाठी आहे. दलित, आदिवासी, मागासलेल्या समाजातील लोकांना सार्वजनिक क्षेत्रात आरक्षण मिळायचे. आता ते सर्वत्र खासगीकरण करीत आहेत. ते सर्व काही अदानींना देत आहेत. माध्यम समूहातील लोक इथे आहेत; परंतु, ते तुमचे नाहीत. ते अब्जाधीशांचे आहेत आणि त्यांच्यासाठीच काम करतात. अंबानींकडील लग्न ते २४ तास दाखवतील.”

हेही वाचा : ५,७०५ कोटींची संपत्ती, ब्रँडेड गाड्या अन् बरंच काही! कोण आहेत लोकसभेचे सर्वात श्रीमंत उमेदवार?

-६ मे, खरगोन (मध्य प्रदेश) : “संपूर्ण सार्वजनिक क्षेत्र नाहीसे होईल आणि देशावर २२-२५ लोक राज्य करतील. ही माणसं कोण आहेत? ते भारताचे अब्जाधीश आहेत आणि अदानींसारखे लोक आहेत; ज्यांची नजर तुमच्या जमीन, जंगल आणि पाण्यावर आहे. या गोष्टी तुमच्याकडून हिसकावून त्यांच्या ताब्यात मिळाव्यात, अशी त्यांची इच्छा आहे. ते नरेंद्र मोदींचे खास मित्र आहेत. अदानींचं नाव ऐकलंय का? पंतप्रधानांना तुमची जमीन, पाणी आणि जंगल त्यांना द्यायचे आहे. पंतप्रधान मोदींनी सर्व विमानतळ, पॉवर स्टेशन, बंदरे, पायाभूत सुविधा या २२-२५ लोकांना दिल्या आहेत. त्यांनी तुमची कर्जे कधीच माफ केली नाहीत; पण त्यांनी २२ श्रीमंतांची १६ लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत. अदानींसारख्या लोकांसाठी १६ लाख कोटी रुपये माफ केले गेले आहेत.”

-६ मे, रतलाम (मध्य प्रदेश) : “माध्यमं कधीच आदिवासींबद्दल बोलत नाहीत. त्यात अंबानींचे लग्न, बॉलीवूड, डान्स दाखवले जातात. पण, जेव्हा आदिवासींवर अत्याचार होतात आणि तुमच्या जमिनी हिसकावून घेतल्या जातात, तेव्हा ते माध्यमांवर दाखवलं जात नाही. नरेंद्र मोदींनी अब्जाधीश असलेल्या २२ लोकांची कर्जे माफ केली आहेत. जर ते श्रीमंतांना पैसे देऊ शकत असतील, तर आम्ही दलित, मागास, आदिवासी आणि सामान्य श्रेणीतील गरिबांना देऊच शकतो.”

-५ मे, नागकुरनूल (तेलंगणा) : “भाजपा हा २-३ टक्के लोकांचा पक्ष आहे. मोदींनी गेल्या १० वर्षांत जे काही केले, ते केवळ २२ लोकांसाठी केले. त्यांनी अदानींसारख्या लोकांची लाखो-कोटींची कर्जे माफ केली. देशाची विमानतळे, बंदरे, पायाभूत सुविधा, संरक्षण उद्योग हे सर्व त्यांनी एका व्यक्तीकडे सोपवले.”

-४ मे, दिल्ली : “सर्वांत मोठ्या २०० कंपन्या पाहा, त्यात तुम्हाला अनुसूचित जाती/जमाती, मागास आणि सामान्य श्रेणीतील गरीब सापडणार नाही. तुमचे किंवा तुमच्या नातेवाइकाचे कर्ज माफ झाले आहे का? अदानी आणि २२ अब्जाधीशांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. हा मनरेगा योजनेसाठीचा २४ वर्षांचा पैसा आहे.”

-२ मे, शिवमोग्गा (कर्नाटक) : “गेल्या १० वर्षांत त्यांनी २२ लोकांसाठी काम केले आहे. त्यांनी देशातील संपत्तीने २२ लोकांचे खिसे भरले आहेत. अदानी, अंबानी आणि अशा लोकांच्या खिशांतील पैशातून आम्ही करोडो लोकांना लखपती करणार आहोत.”

२०१५ पासून राहुल गांधींच्या भाषणात अदानी-अंबानींचा मुद्दा प्रामुख्याने दिसतो. दोन उद्योगपतींचा वारंवार उल्लेख केल्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली आहे. १९९० च्या दशकात उदारीकरणाची सुरुवात करणाऱ्या काँग्रेसने, व्यवसायविरोधी किंवा कॉर्पोरेटविरोधी असल्याचे सांगू नये, असे अनेकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : गोध्रा जळितकांड: मोदींची लालूंवर टीका; नेमका कोणत्या समितीचा उल्लेख केला?

एप्रिल २०१५ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधींनी लोकसभेत नरेंद्र मोदी सरकारला ‘सूट-बूट की सरकार’, असे संबोधले होते. २०१८ पासून ही त्यांच्या संसदेच्या भाषणांची थीम झाली आहे. ‘सूट-बूट की सरकार’, ‘चौकीदार चोर है’ व ‘हम दो हमारे दो’ यांसारख्या घोषणा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेससाठी कधीही फायद्याच्या ठरलेल्या नाहीत. मात्र, ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या भाषणांमध्ये या मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीका करीत आले आहेत. त्यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लोकसभेतील भाषणादरम्यान अदानी यांचा मोदींबरोबरचा एक फोटो दाखवला आणि त्यांच्यात जवळीक असल्याचा दावा केला होता.