Rukhsana Sultana Sterilized 13 thousand Men : २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. याचदरम्यान त्यांचे धाकटे पुत्र संजय गांधी यांनी पाच कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली. त्यातील सर्वांत वादग्रस्त मुद्दा हा लोकसंख्या नियंत्रणासाठी राबविण्यात आलेल्या नसबंदीचा होता. त्यावेळी संजीव गांधी यांच्या निकटवर्तीय रुख्साना सुलताना अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या होत्या. त्यांनी दिल्लीतील तब्बल १३ हजार पुरुषांची नसबंदी ऑपरेशन केल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, कोण होत्या रुख्साना सुलताना? ते जाणून घेऊ…
रुख्साना सुलताना एका श्रीमंत कुटुंबातील व्यक्ती होत्या. काँग्रेसचे दिवंगत नेते संजय गांधी यांच्या निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे दिल्लीतील सनदी अधिकारी आणि काँग्रेस नेतेही रुख्साना यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करायचे. संजय गांधींच्या जवळच्या मंडळींपैकी नसतानाही रुख्साना यांनी जे स्थान मिळवले, ते अनेकांच्या डोळ्यात खुपणारं होतं. एखाद्या अभिनेत्रीसमोरही त्या उठून दिसतील इतक्या त्या सुंदर होत्या, असं सांगितलं जातं. त्यांची राजकीय क्षेत्रातील सक्रियता आणि प्रभाव या बाबी त्या काळात लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या.
रुख्साना यांच्या उपस्थितीने आणीबाणीच्या काळातील राजकीय समीकरणांमध्ये एक वेगळीच रंगत आणली होती. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रशीद किदवई यांच्या मते, रुखसाना त्या काळात जुनी दिल्लीतील नसबंदी मोहिमेच्या प्रमुख चेहरा झाल्या होत्या. १९७५-७७ या काळात केंद्र सरकारने सुरू केलेल्या जबरदस्तीच्या नसबंदी मोहिमेमुळे आजही त्या काळाची आठवण दडपशाही आणि अन्यायाशी जोडली जाते. काही वृत्तांनुसार, रुख्साना यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून हजारो पुरुषांना नसबंदीसाठी प्रेरित करण्यासाठी मानधनही देण्यात आलं होतं.
या मोहिमेसोबतच, १९७६ मध्ये घडलेलं तुर्कमान गेट प्रकरण हे आणीबाणीतील सर्वांत विवादित आणि दडपशाहीपूर्ण प्रकरणांपैकी एक ठरलं. त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला होता. त्या घटनेत रुख्साना सुलताना यांची सत्ताधाऱ्यांशी जवळीक हीच बाब गोंधळ आणि अत्याचाराला मुख्य कारण ठरली, असा आरोप विरोधक आणि नागरिकांनी केला होता.
आणखी वाचा : इंदिरा गांधी व मोरारजी देसाईंना सत्तेतून खाली खेचणारे राज नारायण कोण होते?
रुख्साना सुलताना कोण होत्या?
- आणीबाणीच्या काळात वादग्रस्त ठरलेल्या रुख्साना सुलताना यांना दिल्लीच्या उच्चभ्रू वर्तुळात मीनू बिंबेट या नावाने ओळखलं जायचं.
- १९३४ साली पंजाबमधील जालंधर येथे जन्मलेल्या मीनू बिंबेट यांचे बालपण अत्यंत रंगतदार आणि विविधतेने भरलेले होते.
- एका बाजूला सैनिकी शिस्त, तर दुसऱ्या बाजूला सांस्कृतिक आणि कलात्मक वारसा अशा वातावरणात त्यांचे बालपण गेले.
- मीनू बिंबेट यांचे वडील कॅप्टन मदन मोहन बिंबेट हे भारतीय हवाई दलात अधिकारी होते आणि हिंदू धर्मीय होते.
- त्यांची आई झरीना हक या एक स्वतंत्र विचारसरणीच्या मुस्लीम कुटुंबातून आलेल्या होत्या.
- मीनू बिंबेट या १९५० च्या दशकातील मुंबईतील प्रसिद्ध अभिनेत्री बेगम पारा यांची भाची होत्या.
- रुख्साना सुलताना यांचे नाते लहानपणापासूनच चित्रपटसृष्टी आणि ग्लॅमरच्या जगाशी जोडले गेले.
- त्यांनी शिविंदर सिंह या शीख लष्करी अधिकाऱ्याशी विवाह केला. शिविंदर हे प्रसिद्ध लेखक खुशवंत सिंग यांचे पुतणे होते.
- या दाम्पत्याला अमृता सिंग ही एक मुलगी झाली, जिला पुढे बॉलीवूडमध्ये एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ख्याती मिळाली.
- शिविंदर यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर मीनू बिंबेट यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रवास सुरू केला.
- त्यांनी अत्यंत कमी वेळात दिल्लीतल्या उच्चभ्रू वर्तुळात स्वतःला सिद्ध करीत आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं.
हेही वाचा : जेपींना लाठ्यांपासून वाचवणारी ‘अदृश्य ढाल’, जाणून घ्या नानाजी देशमुख यांची कथा
रुख्साना सुलताना यांच्यावर वादग्रस्त ठसा
राजकारणात आल्यानंतर मीनू बिंबेट यांना रुख्साना सुलताना म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्यांचा राजकारणातील प्रवेश पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून नाही, तर व्यक्तिगत निष्ठा आणि जवळीकतेवर आधारित होता. योगायोगानं त्यांची भेट संजय गांधी यांच्याबरोबर झाली. त्यावेळी रुखसाना संजय गांधींना म्हणाल्या होत्या की, मी तुमच्या नेतृत्वानं प्रभावित झाले आहे आणि मला तुमच्या कार्यात वाहून घ्यायचं आहे. पत्रकार प्रमिला काल्हन यांनी १९७७ मध्ये लिहिलेल्या ‘ब्लॅक वेडनेसडे’ या पुस्तकात काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांचा संदर्भ देत असं नमूद केलंय की, रुखसाना सुलताना यांच्या वाढत्या राजकीय सहभागाला त्यांनी विरोध केला होता.

संजय गांधी म्हणाले होते – युवक काँग्रेसला रुख्सानाची गरज
अंबिका यांनी स्वतः इंदिरा गांधींना संजय आणि रुखसाना यांच्या जवळीकतेबाबत सावध केलं होतं. मात्र, इंदिरा गांधींनी त्याकडे दुर्लक्ष करीत संजयशी तूच बोलून घे, असे सांगून हा मुद्दा टाळला. या वादग्रस्त सहभागाच्या पार्श्वभूमीवर संजय गांधी यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, रुख्साना यांना युवा काँग्रेसची गरज नाही; पण युवा काँग्रेसला रुख्सानाची गरज आहे. मीडिया रिपोर्टनुसार, संजय गांधी यांनी आणीबाणीच्या काळात रुख्साना सुलताना यांना ‘जुनी दिल्ली’ परिसरात कुटुंब नियोजनासाठी काम करण्यास सांगितले. त्या जुन्या दिल्लीच्या ‘बेगम साहिबा’ म्हणून ओळखल्या जात होत्या.
रुख्साना यांनी केली होती १३ हजार पुरुषांची नसबंदी
रुख्साना यांना पोलीस संरक्षण होतं आणि त्यांच्यासोबत सरकारी अधिकारीही असायचे. रुख्साना सुलताना यांनी आणीबाणीच्या काळात जवळपास १३ हजार पुरुषांची नसबंदी करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. त्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून त्यांना ८४ हजार रुपये देण्यात आली होती. त्या काळी ही मोठी रक्कम होती. यावेळी वयात आलेली मुलं आणि वृद्ध पुरुषांचीही नसबंदी करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला. तसेच फसलेल्या काही ऑपरेशनमुळे लोकांचे मृत्यू झाल्याचं समोर आलं. नसबंदीमुळे पुरुषांची ‘कामुक उत्तेजना’ कमी होते अशा अफवाही काही राज्यांमध्ये पसरल्या होत्या. पुरुष नसबंदी टाळण्यासाठी घरातून पळून जायचे.
रुख्साना यांच्यावर भ्रष्टाचाराचे झाले होते आरोप
देशभरात या मोहिमेविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात डझनभर लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले होते, असंही सांगण्यात येतं. दरम्यान, आणीबाणीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आणि जनता पार्टीचे सरकार आले. त्यावेळी काही काळासाठी रुख्साना या सक्रिय राजकारणापासून दूर गेल्या होत्या; पण तरीही त्या संजय गांधी यांच्या नेहमीच संपर्कात असायच्या, असं सांगितलं जातं. यादरम्यान, रुख्साना यांच्यावर अनेकदार भ्रष्टाचार आणि फसवणुकीचे आरोप करण्यात आले होते; पण संजय गांधी यांनी त्यांचा बचाव केला होता.
संजय गांधींच्या मृत्यूनंतर रुख्सानाचे वलय संपले
राजकीय पक्षांमधील परस्पर संघर्षामुळे सुमारे साडेतीन वर्षांतच जनता पार्टीचे सरकार कोसळले आणि त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला. त्यावेळी संजय गांधी यांनी काँग्रेसमधील जुन्या व अनुभवी नेत्यांना पदोन्नती देण्यात आली; तर आणीबाणी काळातील वादग्रस्त चेहरे काढून टाकण्यात आले. रुख्साना या त्यापैकी होत्या. संजय गांधी यांचा एका विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर सहा महिन्यांतच रुख्साना यांचं वलय संपलं. हळूहळू राजकीय पक्ष आणि माध्यमांनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली.
अमृता सिंगच्या लग्नानंतर आल्या होत्या चर्चेत
जेव्हा त्यांची मुलगी अमृता सिंग हिनं अभिनेता सैफ अली खानसोबत लग्नगाठ बांधली, तेव्हा रुख्साना काही काळ प्रकाशझोतात आल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांनीच त्यांचा मृत्यू झाला. संजय गांधी यांची राजकीय कारकीर्द आणि वारसा यांवर मतमतांतरं असली तरी रुख्साना सुलताना यांच्या राजकीय अध्यायाकडे कायमच एक इशारा देणारी गोष्ट म्हणून पाहिले जाते. ज्यावेळी व्यक्तिगत निष्ठा लोकशाही संस्थांवर मात करते आणि अनियंत्रित सत्ता महत्त्वाकांक्षेशी जुळते, तेव्हा राष्ट्रीय संकट किती खोलवर जाऊ शकतं, याचं ते उदाहरण मानलं जातं.