काँग्रेसने रविवारी ऐतिहासिकदृष्ट्या उपेक्षित समुदायातील नेत्यांना तीन मंत्रिमंडळ पदे दिली आणि गेल्या अनेक काळापासून प्रलंबित असलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला. तेलंगणाच्या अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी) प्रभारी मीनाक्षी नटराजन यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. रविवारी (८ जून) दुपारी अदलुरी लक्ष्मण कुमार, गद्दम विवेक वेंकटस्वामी आणि श्रीहरी नारायणपेट यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. हे नेते नक्की कोण आहेत? काँग्रेसने उपेक्षित समुदायातील नेत्यांना मंत्रिपद का दिले? त्याविषयी जाणून घेऊयात.
उपेक्षित समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना मंत्रिपद
झ काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी माहिती दिली की, हे तिन्ही नेते माडिगा (अनुसूचित जाती), माला (अनुसूचित जाती) आणि मुदीराज (मागासवर्गीय) या समुदायांचे प्रतिनिधित्व करतात. “कॅबिनेट विस्तारात सामाजिकदृष्ट्या उपेक्षित समुदायांशी थेट संवाद साधावा असा निर्णय भारतीय काँग्रेस समितीने घेतला होता. सामाजिकदृष्ट्या मागास समुदायातून येणारे आमदार हे काँग्रेसचे बलस्थान आहेत आणि पक्षश्रेष्ठींचेही असेच मत आहे,” असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात १५ मंत्री आहेत. मंत्रिमंडळात आणखी तीन जागा रिक्त आहेत, त्यामुळे मंत्रिमंडळात एकूण १८ मंत्री असू शकतात.
एका काँग्रेस नेत्याने सांगितले, “पक्षातील अनेक इच्छुक नेत्यांना कळवण्यात आले होते की, सामाजिक न्यायाला सामोरे ठेवून हा विस्तार केला जाईल. ही पक्षाची रणनीती आहे आणि काही जण अनिच्छुक असले तरी सर्व जण त्यात सहभागी झाले,” असे ते म्हणाले. मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या उमेदवारांमध्ये आमदार सुदर्शन रेड्डी, कोमाती रेड्डी राजगोपाल रेड्डी, प्रेम सागर राव आणि मालरेड्डी रंगा रेड्डी या नेत्यांचा समावेश होता. काँग्रेस नेत्याने म्हटले, “गेल्या काही महिन्यांपासून पक्ष नेतृत्व त्यांच्या उमेदवारीवर विचारविनिमय करत आहे. परंतु, प्रत्येक इच्छुक नेत्यांना कळवण्यात आले होते की अंतिम निर्णय भारतीय काँग्रेस समितीतील नेत्यांचा आहे.”
मंत्रिपदाची शपथ घेणारे नवीन मंत्री कोण आहेत?
- शपथ घेणारे माला नेते गद्दम विवेक वेंकटस्वामी हे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री जी. वेंकटस्वामी यांचे पुत्र आहेत.
- २००९ मध्ये वेंकटस्वामी यांनी काँग्रेस सोडून भारत राष्ट्र समिती (बीआरएस) मध्ये प्रवेश केला.
- परंतु, २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले.
- सूत्रांनुसार, त्यांनी मंचेरियाल जिल्ह्यातील चेन्नूर जागा जिंकल्यास त्यांना उच्च पदाचे आश्वासन देण्यात आले होते.
- त्यांनी २७,००० पेक्षा जास्त मतांनी ही जागा जिंकली.
- शपथ घेणारे दुसरे मंत्री अदलुरी लक्ष्मण कुमार हे मडिगा समुदायातील नेते आहेत.
- ते जगतियाल जिल्ह्यातील धर्मपुरी येथून पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.
- काँग्रेसच्या युवा शाखेतून राजकीय कारकीर्द सुरू करणारे ओबीसी नेते श्रीहरी नारायणपेट जिल्ह्यातील मकथल मतदारसंघातून निवडून आले आहेत.
काँग्रेसने तीन नवीन मंत्र्यांना समाविष्ट करण्याव्यतिरिक्त रामचंद्रू नाईक यांची विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. नाईक हे आदिवासी नेते आणि महाबुबाबाद जिल्ह्यातील दोरनाकल येथून निवडून आलेले आमदार आहेत. तेलंगणा प्रदेश काँग्रेस समिती (टीपीसीसी) च्या नेत्यांनी सांगितले की, भारतीय काँग्रेस समितीशी सल्लामसलत केल्यानंतर नवीन सदस्यांच्या नियुक्त्यांना मान्यता देण्यात आली. प्रदेश काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले, “ही नावे निश्चित करण्यासाठी तामिळनाडू काँग्रेसने भारतीय काँग्रेस समितीतील नेतृत्वाबरोबर अनेक बैठका घेतल्या; आम्हाला आनंद आहे की यावर एकमत होऊ शकले.”