कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात श्रीमंत शाहू महाराज यांना उमेदवारी मिळत असतानाच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची राजवाड्यावर जाऊन भेट घेतली. या निमित्ताने छत्रपती आणि ठाकरे घराण्यातील संबंध अधीकच दृढ झाले. राजर्षी शाहू महाराज व प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून सुरू असलेला दोन्ही घराण्यातील जिव्हाळा आता पुढील पिढीपर्यंत पोहोचला आहे. राजकारणाच्या पल्याड व्यक्तिगत पातळीवरही दोन्ही घराण्याचे संबंध राहिल्याचे इतिहासात डोकावताना दिसते.

महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेत राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाला महत्व आहे. याच काळात प्रबोधनकार ठाकरे हेही या वाटेचे बिनीचे शिलेदार होते. हे दोघे अनेकदा वैचारिक बांधिलकीतून एकत्र आले. शाहू महाराज मुंबईला जात तेव्हा ठाकरेंशी विविध मुद्द्यांवर चर्चा होत असत. दोघांनी एकमेकांना अडचणीच्या वेळी बऱ्याचदा मदत केली आहे. अनेकदा दोघांमध्ये टोकाचा कडवटपणा आला पण तत्त्वनिष्ठतेमुळे दोघातील संबंध घट्ट राहिले. छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे या त्रयीने केलेल्या सामाजिक कार्यावर आधारित डॉ. जयसिंगरावपावर यांचे पुस्तक गाजले आहे.

हेही वाचा : रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजप आणि शिंदे गटात अस्वस्थता

छत्रपती- ठाकरे घराण्यातील हे संबंध पुढच्या पिढीतही असेच कायम राहिले. शिवसेनेची भरभराट होत गेली तेव्हा राज्याच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा होता. त्यांचे व श्रीमंत शाहू महाराज यांच्याशी नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध राहिले. काल उद्धव ठाकरे यांनीही राजर्षी शाहू महाराज व आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून सुरू झालेले दोन घराण्याचे संबंध, गाठीभेटी याचा आवर्जून उल्लेख करून नातेबंध आजही आहेत; पुढेही राहतील, असे विधान केले होते.

हेही वाचा : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढीस?

दोन्ही घराण्यातील संबंधावर प्रकाश टाकताना श्रीमंत शाहू महाराज यांनी काही किस्से ‘लोकसत्ता’शी बोलताना कथन केले. त्यांनी सांगितले कि, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या तिन्ही पिढ्या आमच्या राजवाड्यावर आल्या. तेव्हा आमच्या घराण्यातील तिन्ही पिढ्यांनी त्यांचे स्वागत केले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचा मंत्रालयात जाऊन मी सत्कार केला होता. बाळासाहेब ,उद्धव यांच्याशी राजकारण वगळता इतर वेळीही प्रासंगिक चर्चा, संवाद होत असतो. आताही लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही कुटुंबातील ओलावा वाढीस लागला आहे.