मुंबई : पुस्तक प्रकाशन समारंभापासून अगदी छोट्या-मोठ्या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूरचे सातत्याने दौरे करीत असल्याने या दोन्ही नेत्यांनी पुणे व कोल्हापूरवर का लक्ष केंद्रीत केले आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात घडत असते.

मुख्यमंत्री फडण‌वीस हे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित होते. गेल्या आठवड्यातही त्यांचा पुणे दौरा झाला. नागपूर हा आपला गड सांभाळतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या बालेकिल्ल्याप्रमाणेच कोल्हापूरकडे अधिक लक्ष देतात. कोल्हापूरमध्ये छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असते. पंधरवड्यातून एक तरी दौरा कोल्हापूर जिल्ह्यात ठरलेला असतो.

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून फडणवीस यांनी पुण्याकडे अधिक लक्ष दिले आहे. उपमुख्यमंत्री असतानाही त्यांचे पुणे दौरे वारंवार होत असत. पण अलीकडे दौऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते. भाजपला महाराष्ट्रात ‘शत प्रतिशत’ ताकद निर्माण करायची आहे. सध्या शिवसेना (शिंदे) किंवा राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या मदतीने महायुतीचे सरकार आहे. महाराष्ट्रात भाजपला स्वबळावर भविष्यात संधी असल्याची टिप्पणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मागे केली होती. ‘सध्या महायुतीचे सरकार असले तरी २०२९ मध्ये एकट्या भाजपचे सरकार राज्यात सत्तेत येईल, असे भाकित अमित शहा यांनी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी व्यक्त केले होते. याचा अर्थ स्पष्ट आहे. भाजपला राज्यात स्वबळावर सरकार आणायचे आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकण, मराठवाड्यात भाजपचा चांगला जम बसला आहे. अपवाद फक्त पश्चिम महाराष्ट्राचा. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी वा काँग्रेसमधील नेत्यांची भाजपला पक्ष वाढविण्यासाठी मदत घ्यावी लागली. भाजपची स्वत:ची अशी ताकद अद्यापही निर्माण झालेली नाही. यामुळेच बहुधा फडणवीस यांनी पुण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पुणे व त्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र पादाक्रांत करण्याची फडण‌वीस यांची योजना दिसते. पुणे महानगरपालिका हे भाजपचे उद्दिष्ट आहेच. पुण्यात अजित पवार हे सुद्धा प्रयत्नशील आहेत. पण पुणे भाजप व पिंपरी-चिंचवड अजित पवारांना असा तोडगा महायुतीत निघू शकतो, असे महायुतीतच अंदाज व्यक्त केला जातो. पुणे लोकसभा तसेच शहरातील विधानसभा मतदारसंघात भाजपने चांगले यश मिळविले. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच निवडून आले असताना त्यांचा मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. शहरातील माधुरी मिसाळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाला.

पुण्यात पाया भक्कम झाल्यावर सातारा, सांगली, नगर या जिल्ह्यांमध्ये ताकद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो. साताऱ्यात शिवेंद्रनराजे भोसले, जयकुमार गोरे यांना मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती सोपावून पक्ष वाढविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सांगलीत भाजपने बऱ्यापैकी ताकद निर्माण केली आहे. नगरमध्ये साखर सम्राटांना बरोबर घेत भाजपने हातपाय पसरले आहेत. कोल्हापूरमध्ये अजून तेवढी हवा निर्माण झालेली नाही. पुण्यात वातावरणनिर्मिती करीत सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने ताकद वाढविण्याची भाजपची योजना दिसते. यातूनच फडणवसी यांनी पुण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोल्हापूर जिल्हा अधिक बळकट करायचा आहे. जिल्ह्यात एक खासदार व तीन आमदार अशी शिवसेनेची ताकद आहे. २०१४ मध्ये एकत्रित शिवसेनेने कोल्हापूरमध्ये चांगले यश संपादन केले होते. पण तेव्हा सत्तेत कोल्हापूर जिल्ह्याला शिवसेनेने स्थान दिले नाही. त्याचा परिणाम २०१९च्या निवडणुकीत कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा धुव्वा उडाला होता. ही चूक पुन्हा होऊ नये याची खबरदारी शिंदे घेत आहेत. मुंबई, ठाणे, कोकणानंतर शिंदे यांना कोल्हापूर अधिक सोयीचा जिल्हा वाटतो. त्या दृष्टीने त्यांनी कोल्हापूरवर लक्ष केंद्रित केले आहे. शिंदे यांचे कोल्हापूर जिल्ह्यात सतत दौरे सुरू असतात. जणेकरून कोल्हापूर हा बालेकिल्ला व्हावा, असे शिंदे यांचे प्रयत्न दिसतात.