हिंजवडीतील आयटी पार्कमधील 'इन्फोसिस' कंपनीत काम करणाऱ्या रसिला राजू हिच्या हत्येनंतर तिच्या कुटुंबीयांना कंपनीतर्फे एक कोटी रुपयांची मदत आणि तिच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरीत सामावून घेतले जाणार आहे, असे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे. तसेच विम्याची रक्कमही तिच्या कुटुंबीयांना देण्यात येणार असल्याचे पत्र रसिलाच्या वडिलांना दिले आहे. दरम्यान, रसिलावर मंगळवारी तिच्या मूळ गावी कोझिकोडेमधील पेईम्बरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 'इन्फोसिस' या कंपनीमध्ये रसिला राजू ओ. पी (वय २५) ही तरुणी अभियंता म्हणून काम करत होती. रसिला ही मूळची केरळची होती. रविवारी रात्री कंपनीच्या आवारात रसिलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. रसिलाचा वायरने गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी सुरक्षा रक्षक बाबेनला मुंबईतून अटक केली. रसिलाची हत्या केल्यानंतर बाबेन सैलिया याने त्याची उरलेली दोन तासांची ड्युटी पूर्ण केली. त्यानंतर तो या ठिकाणाहून बाहेर पडला. याशिवाय, ज्याठिकाणी रसिलाची हत्या झाली त्या नवव्या मजल्यावर ती एकटीच काम करत होती. धक्कादायक गोष्ट म्हणजे याठिकाणी महिला सुरक्षारक्षक तैनात नव्हती. रसिला ही संध्याकाळी चहा पिण्यासाठी बाहेर येत असताना बाबेन तिच्याकडे बघत असल्याचा संशय रसिलाला आला. तिने यावरुन बाबेनला जाबही विचारला. तसेच याप्रकरणाची तक्रार वरिष्ठांकडे करु असे तिने सांगितले होते. नोकरी जाईल या भीतीपोटी बाबेनने रसिलाकडे तक्रार करु नये यासाठी विनवणी केली. यावरुन रसिला आणि बाबेनमध्ये वादही झाला. या वादानंतर बाबेनने रसिलाचा गळा आवळून खून केला होता. सुरक्षारक्षकाच्या गैरवर्तनाबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्याची तंबी दिल्यामुळे सुरक्षारक्षकाने तिचा खून केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. तरुणीचा खून करून पसार होण्याच्या तयारीत असलेला सुरक्षारक्षक भावेन भराली सैकिया (वय २७, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा. तातीबहार, जि. लखीमपूर, आसाम) याला मुंबईतून अटक केली. त्याला ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, इन्फोसिसने या घटनेनंतर दुःख व्यक्त करून रसिलाच्या कुटुंबीयांच्या दु:खात व्यवस्थापन सहभागी आहे, असे म्हटले होते.