पुणे : पुणे विभागात पुढील दोन वर्षांत १६ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होणार आहे. त्यातून सुमारे २९ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. या गुंतवणुकीबाबतच्या ७२ परस्पर सामंजस्य करारांवर जिल्हास्तरीय औद्योगिक गुंतवणूक परिषदेत गुरूवारी स्वाक्षरी करण्यात आली.

उद्योग संचालनालयच्या अखत्यारीतील जिल्हा उद्योग केंद्र पुणेतर्फे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरमध्ये (एमसीसीआय) जिल्हास्तरीय औद्योगिक गुंतवणूक परिषद २०२४ चे आयोजन गुरूवारी करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबने उपस्थित होते.

हेही वाचा >>>शिरूरमधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढण्याची आढळरावांची अप्रत्यक्ष कबुली

यावेळी बोलताना उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत म्हणाले की, राज्य सरकारकडून जिल्हास्तरीय औद्योगिक गुंतवणूक परिषद घेतल्या जात आहे. मागील काही दिवसात पुणे विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये परिषद झाली. आता पुण्यात ही परिषद होत आहे. या परिषदेच्या निमित्ताने पुणे विभागातील १६ हजार ५८१ कोटी रुपयांच्या एकूण ७२ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. यामुळे २९ हजार १३ रोजगार निर्माण होणार आहेत.

महाराष्ट्राच्या निर्यातीची परिस्थिती, उद्योगांना नियंत्रित करणारी धोरणे आणि आगामी गुंतवणूक परिषदेविषयी माहितीही राजपूत यांनी दिली. त्यांनी राज्याच्या निर्यात, उद्योग आणि आयटी-आयटीईएस धोरणांची रूपरेषा सांगितली. विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी आणि या प्रदेशातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी जिल्हा विकासासाठी विविध विभागांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी जिल्हा धोरण आराखड्याचे महत्त्व मांडले.

हेही वाचा >>>राज्यात उन्हाच्या झळा, पारा ३८ अंशांवर; सोलापुरात सर्वाधिक ३८.६ अंश सेल्सिअसची नोंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यक्रमात एनझेडयुआरआय पुणे नॉलेज पार्क प्रायव्हेट लिमिटेड आणि जीव्हीएस एअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यासह विविध क्षेत्रांमध्ये प्रस्तावित गुंतवणुकीसाठी ७२ गुंतवणूकदार आणि जिल्हा उद्योग केंद्र पुणे यांच्यात सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. गिरबाने यांनी प्रास्ताविकात विविध क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी माहिती दिली. निर्यातीत अग्रेसर पाच राज्यांपैकी एक महाराष्ट्र असल्याचे सांगताना निर्यातीला चालना देण्यात पुण्याच्या वाहन अभियांत्रिकी क्षेत्राने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे त्यांनी सांगितले.