पुणे : ‘इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी क्षेत्रात उच्च तंत्रज्ञान, ऑटोमेशन आणि कृत्रिम प्रज्ञेची (एआय) जास्त गरज आहे. यामुळे शेतीच्या परंपरागत पद्धतीच्या कामात बदल होईल. याचबरोबर शेतीच्या कामात अधिक अचूकता येईल. हे तंत्रज्ञान उत्पादन, उत्पादकता यावर परिणाम करणारे ठरेल,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केले.
शिरूर औद्योगिक वसाहत क्षेत्रात ‘जॉन डिअर इंटेलिजेंट सोल्युशन्स’च्या सणसवाडी प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी फडणवीस बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक संदीप गिल आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले, ‘कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) कृषी क्षेत्रातही उपयोग सुरू झाला आहे.
यामुळे कृषी प्रक्रियेत अनुकूल बदल घडवून उत्पादनात गुणात्मक बदल घडविण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होत आहे. कृषी क्षेत्रात त्यामुळे खूप चांगले बदल घडून येत आहेत. नुकत्याच पुण्यात झालेल्या कृषी हॅकॅथॉनमध्ये अनेक चांगल्या कल्पना पुढे आल्या. या कल्पनांना उत्पादनात बदलून ही उन्नत तंत्रज्ञानाची क्रांती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची क्षमता ‘जॉन डिअर’मध्ये आहे.’
‘जॉन डिअर इंडिया’ने पेरणीपासून कापणी पश्चात कृषी प्रक्रियेपर्यंत संपूर्ण कृषी कार्यात कंपनीने चांगले तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. कंपनीच्या पुण्यातील प्रकल्पाने ‘मेक इन महाराष्ट्र’ला महत्त्व दिले आहे. त्यांनी कृषी क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी उन्नत तंत्रज्ञानावर आधारीत स्मार्ट यंत्रांच्या उत्पादनात पुढाकार घ्यावा आणि असे तंत्रज्ञान महाराष्ट्रात तयार करून जगात निर्यात करावे, असे फडणवीस यांनी नमूद केले. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश सिन्हा यांनी प्रास्ताविकात प्रकल्पाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात उद्योगांसाठी चांगले वातावरण असल्याने ‘जॉन डिअर इंडिया’ने राज्यात पाचवी मोठी गुंतवणूक केली आहे. कृषी क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन घेण्यास नव्या प्रकल्पामुळे मदत होणार आहे.’